वाळवा तालुका राष्ट्रवादी तर्फे निषेध मोर्चा : शिंदे-फडणवीस सरकार विरोधात घोषणाबाजी :पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेवून सोडले
प्रतिनिधी/ इस्लामपूर
नागपूर येथील हिवाळी अधिवेशनामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटील यांना जाणीवपूर्वक निलंबित करणाऱ्या शिंदे – फडणवीस सरकारचा वाळवा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने निषेध करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली.
येथील कचेरी चौकातील तहसील कार्यालयासमोर राष्ट्रवादीच्या काँग्रेसच्यावतीने निषेध करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादीचे तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान निषेध मोर्चाचे ठिय्या आंदोलनात रूपांतर झाल्याने इस्लामपूर पोलीसांनी काही आंदोलन कर्त्यांना ताब्यात घेतले. यामध्ये वाळवा तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष विजय पाटील, माजी नगराध्यक्ष चिमण उर्फ राजेंद्र डांगे, शहराध्यक्ष शहाजी पाटील, संग्राम जाधव, शैलेंद्र पाटील, शैलेंद्र सुर्यवंशी, संजय पाटील, शंकर पाटील, विठ्ठल पाटील, सचिन कोळी, स्वरुप मोरे, सुरज कचरे, गोपाळ नागे, राजकेदार आटुगडे, विशाल माने, मोहन भिगांर्डे यांना पोलिसांनी ताब्यात घेवून समज देऊन सोडून दिले.
शिराळ्यातही तहसील कार्यालयावर मोर्चा
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांचे निलंबन मागे घेऊन लोकशाही जिवंत ठेवावी अन्यथा यापुढचे आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कडून उग्र स्वरूपाचे करण्यात येईल असा इशारा राष्ट्रवादीचे युवा नेते, माजी जिल्हा परिषद सदस्य रणधीर नाईक यांनी दिला.शिराळा तहसील कार्यालयावर मोर्चा काढून तहसीलदार यांना निवेदन देताना ते बोलत होते.यावेळी बोलताना रणधीर नाईक म्हणाले, प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील हे विधी मंडळातील ज्येष्ठ आणि अभ्यासू नेते आहेत. यांच्या विधानाचा विपर्यास करून सत्ताधारी मंडळी लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न करीत आहेत. हे दबावतंत्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कदापि सहन करणार नाही. सदरचे निलंबन मागे घेतले नाही तर सांगली जिल्ह्यासह संपूर्ण राज्यभर उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल त्याची सर्वस्वी जबाबदारी ही शासनाची असेल.असंही ते म्हणाले आहेत.यावेळी भूषण नाईक, तालुकाध्यक्ष विजयराव नलवडे, माजी उपसभापती बी के नायकवडी,महिला तालुकाध्यक्ष साधना पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.