काकतीवेस, खडक गल्ली परिसरात अतिदक्षता
बेळगाव : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरांमध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्याबरोबरच संवेदनशील भागामध्ये अतिदक्षता घेण्यात आली. या पार्श्वभूमीवर संवेदनशील भागात राखीव दलाच्या तुकडींची नियुक्ती करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुका सुरळीतपणे पार पाडाव्यात यासाठी निवडणूक विभागाकडून संवेदनशील अति संवेदनशील मतदान केंद्राची नोंद केली आहे त्यानुसार संबंधित भागात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. शहरामध्ये काकतीवेस, खडक गल्ली परिसरात राखीव दलांच्या जवानांची नियुक्ती करण्यात आली होती. लोकसभा निवडणुकीसाठी दि. 7 मे रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे संवेदनशील भागात अतिदक्षता राखण्यात येत आहे. पोलीस कर्मचाऱ्यांसह सुरक्षा दलाच्या जवानांची ठिकठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे.