आदरणीय व्यक्तीमत्व असलेले राष्ट्रीय नेते शरद पवार यांना सहा महीन्यात दोन वेळा धमकी देण्यात आली आहे. धमकी देणाऱ्याला त्वरित अटक करण्याची मागणी राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार हसन मुश्रीफ यांनी केली आहे. त्याचबोरबर शरद पवार यांच्यावर एकेरी शब्दात टिका करणे हि फॅशन झाली असपल्याची टिकाही त्यांनी केली.
कोल्हापूरात बोलताना ते म्हणाले, “शरद पवार हे एक आदरणीय व्यक्ती म्हणून संपूर्ण देश त्यांना ओळखतं. त्यांच्या शब्दाला मोठी किंमत आहे. अशा व्यक्तिमत्त्वाला गेल्या सहा महिन्यात दोन वेळा धमकीचे फोन आले आहेत. ज्यांनी धमकी दिली आहे त्यांची त्वरित सखोल चौकशी करून कारवाई व्हायला हवी.” अशी मागणी त्यांनी केली.
पुढे बोलताना त्यांनी, “शरद पवार यांच्यावर एकेरी उल्लेख करून बोलणं हे आजकाल काही जणांची फॅशन झाली आहे. त्याचा आम्ही निषेध करतो. पवार साहेबांचं वय काय आणि वक्तव्य करणाऱ्यांचे वय काय ? हे टिका करणारे लोक टीव्हीवर आले की दर्शक अक्षरश टीव्ही बंद करून बसतात. आपण काय बोलतोय आणि ते कोणाबद्दल वक्तव्य करतोय हा सगळा देश बघत आहे.” असे ते म्हणाले.
शरद पवार यांना मिळालेल्या धमकीवर बोलताना ते म्हणाले, “आता राज्यामध्ये शिंदे- फडणवीस सरकार आहे आणि कायदा व सुव्यवस्था पाळणे हे त्यांची जबाबदारी आहे. धमकीचे ट्विट गांभीर्याने घेणे गरजेचे असून अशा व्यक्तींवर त्वरित कारवाई करणे गरजेचे आहे” असा सल्ला त्यांनी दिला.
दंगलीवर भाष्य करताना त्यांनी “जमाबंदी असतानाही कोल्हापुरात लोक जमले. हे जर झालं नसतं तर अशी घटना घडली नसती. गृह खात्याने त्यांच्या इंटेलिजन्सला गांभीर्याने घेण्याचे गरजेचे आहे. अशा घटना हे सरकार आल्यावरच मोठ्या प्रमाणात घडत आहेत हे गांभीर्याने घेणे गरजेचे आहे” असेही ते म्हणाले.