शाकंभरी पौर्णिमेला होणार यात्रा
प्रतिनिधी /बेळगाव
सौंदत्ती येथील यल्लम्मा देवीच्या यात्रेसाठी बेळगाव शहर व परिसरातून रेणुका भक्त रविवारपासून रवाना झाले. शुक्रवारी शाकंभरी पौर्णिमेला यात्रा भरणार असून, त्यापूर्वी डोंगरावर जावून जागा मिळविण्यासाठी भाविकांची धडपड सुरू आहे. ‘उदो गं आई उदो’च्या गजरात भंडाऱ्याची उधळण करत भाविक वाहनांनी सौंदत्तीच्या दिशेने रवाना होत आहेत.
सौंदत्ती येथे दरवर्षी शाकंभरी पौर्णिमेनिमित्त मोठी यात्रा भरते. 4 ते 5 लाख भाविक यात्रेमध्ये सहभागी होतात. मागील पौर्णिमेला कोल्हापूर येथील भाविकांची यात्रा पार पडल्यानंतर यावेळी बेळगाव व चंदगड परिसरातील भाविकांची यात्रा भरते. मागील दोन वर्षात कोरोनामुळे यात्रेवर बरेच निर्बंध आले होते. त्यामुळे भाविकांची संख्याही रोडावली होती. यावर्षी मोठ्या प्रमाणात यात्रा भरणार असल्याने जय्यत तयारी केली जात आहे.
बेळगाव शहर व तालुक्यातून लाखो भाविक यात्रेसाठी जातात. प्रत्येक गाववार चार चाकी वाहने, परिवहन मंडळाच्या बसेस यांच्या साहाय्याने भाविक रवाना होत आहेत. शुक्रवारी पडल्या भरण्याचा धार्मिक विधी असल्याने त्यापूर्वी डोंगरावर जाऊन वास्तव्य केले जाते. रविवारपासून भाविक रवाना होत असून, पुढील दोन दिवसात मोठ्या संख्येने भाविक जाण्याची शक्यता आहे.