जलवाहिनीच्या कामाला चालना : काही प्रभागात पुरवठा विस्कळीत
प्रतिनिधी/ बेळगाव
शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी एलअॅण्डटी कंपनीचे प्रयत्न सुरू आहेत. काही भागामध्ये 24 तास सुरळीत पाणीपुरवठा केला जात आहे. अनगोळ मेन रोड येथे 24 तास पाणीपुरवठ्यासाठी खोदाईचे काम हाती घेण्यात आले आहे. येत्या दिवसांत जलवाहिनीच्या कामानंतर या विभागात 24 तास पाणीपुरवठा होणार आहे.
शहर आणि उपनगराला राकसकोप आणि हिडकल जलाशयातून पाण्याचा पुरवठा केला जातो. मात्र यंदा जलाशयांच्या पाणीपातळीत घट झाल्याने शहरातील पाणीपुरवठ्याचे वेळापत्रकही कोलमडले आहे. काही भागात चार ते आठ दिवसाआड पाण्याचा पुरवठा होऊ लागला आहे. अशा परिस्थितीत एलअॅण्डटी कंपनीचेही पाण्याचे नियोजन करताना तीनतेरा वाजू लागले आहेत. एकीकडे पाण्याची टंचाई निर्माण होऊ लागली आहे, तर दुसरीकडे जलवाहिनींच्या गळतीचे प्रकार सुरूच आहेत. त्यामुळे एलअॅण्डटी कंपनीसमोर ऐन उन्हाळ्यात दुहेरी संकट उभे ठाकले आहे.
शहरातील अनगोळ आणि भाग्यनगरमधील काही भागात 24 तास पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र काही भागात अद्यापही चार दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. येथील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी अनगोळ मेन रोडवर खोदाईचे काम हाती घेण्यात आले आहे. या ठिकाणी नवीन जलवाहिनी घालून 24 तास पाणीपुरवठा केला जाणार आहे.
24 तास पाणी नसले तरी सुरळीत पुरवठा व्हावा
एलअॅण्डटीने दोन-चार प्रभागात 24 तास पाण्याची व्यवस्था केली आहे. मात्र उर्वरित प्रभागांमध्ये पाणीपुरवठा विस्कळीत होऊ लागला आहे. जलाशय, तलाव, विहिरींची पाणीपातळी झपाट्याने खालावली आहे. त्यामुळे पाण्याची टंचाई भासू लागली आहे. 24 तास पाणी नसले तरी सुरळीत पाणीपुरवठा व्हावा, अशी माफक अपेक्षाही नागरिकांतून व्यक्त होत आहे.