मतदानावर बहिष्कार न घालण्याचा सल्ला
प्रतिनिधी /काणकोण
पैंगीण पंचायतीच्या मार्ली वॉर्डाच्या चिपळे, काळशी भागांतील मतदारांनी मतदानावर बहिष्कार घालण्याचा जो निर्णय घेतला आहे त्याची गंभीर दखल सरकारने घेतली असून काणकोणचे मामलेदार तथा निर्वाचन अधिकारी मनोज कोरगावकर यांनी चिपळेवाडय़ावर भेट देऊन मतदारांशी चर्चा केली आणि घटनेने जो मतदानाचा हक्क दिलेला आहे त्याचे पालन करावे, असे आवाहन केले.
सतत तीन निवडणुकांत सदर वॉर्ड अनुसूचित जमातींसाठी राखीव ठेवल्याने बहुसंख्येने असलेल्या मतदारांवर अन्याय झालेला आहे. मतदान केंद्र काळशी, चिपळे, बादेगाळ, तिर्वण या भागांपासून 16 किलोमीटर अंतरावर आहे. आजवर निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनी या भागांकडे कधीच लक्ष दिलेले नाही. वारंवार वीजपुरवठा खंडित होणे, पिण्याच्या पाण्याची समस्या यांचे निराकरण करण्याच्या बाबतीत त्यांच्याकडून लक्ष दिले गेलेले नाही, अशा कित्येक समस्या मतदारांनी निर्वाचन अधिकारी कोरगावकर यांच्यासमोर मांडल्या.
त्या समस्या ऐकून घेऊन कोरगावकर यांनी सांगितले की, याला खूप उशीर झालेला आहे. निवडणूक जाहीर होण्याअगोदर यासाठी प्रयत्न करायला हवे होते. विधानसभा आणि पंचायतीच्या निवडणुकांची पद्धत वेगळी आहे. पंचायत निवडणुकांसंबंधीचा निर्णय राज्य निर्वाचन आयोगाकडून घेतला जात असतो. आपल्या न्याय्य मागण्या ग्रामसभेसमोर मांडा. त्याचबरोबर आपला राग मतदानातून व्यक्त करा, परंतु मतदानावर बहिष्कार घालू नका, असे त्यांनी सूचित केले. आपण सर्व मतदारांचे मन वळविण्याचा प्रयत्न केलेला असून बहुतेक मतदार मतदानासाठी राजी होतील, असा विश्वास कोरगावकर यांनी व्यक्त केला आहे.