863 घरांना तडे ः 181 घरे असुरक्षित, आतापर्यंत 242 कुटुंबांना 3.62 कोटींचे वाटप
जोशीमठ / वृत्तसंस्था
उत्तराखंडच्या जोशीमठमध्ये सुरू असलेल्या हिमवृष्टीमुळे प्रशासन आणि लोकांच्या अडचणीत भर पडली आहे. आतापर्यंत येथील एकूण 863 घरांमध्ये तडे गेल्याचे निदर्शनास आले आहे. यापैकी 181 घरे असुरक्षित घोषित करण्यात आली आहेत. धोकादायक स्थितीमुळे लोकांचे विस्थापन सुरू करण्यात आले असून उत्तराखंड सरकारने आतापर्यंत 242 कुटुंबांना 3.62 कोटी रुपयांची मदत वाटप केली आहे.
जोशीमठमधून स्थलांतरित करण्यात येत असलेल्या लोकांची तात्पुरती सोय मदत छावण्यांमध्ये केली जात आहे. जोशीमठवासियांच्या पुनर्वसनासाठी एका ठिकाणी 2,919 लोकांच्या क्षमतेच्या 650 खोल्या उपलब्ध करून दिल्या आहेत. तसेच काही लोकांचे पिपळकोटी येथे स्थलांतर करण्यात येत असून तेथे 2,205 लोकांच्या क्षमतेच्या 491 खोल्या सुसज्ज ठेवण्यात आलेल्या आहेत. राज्य आपत्ती व्यवस्थापन सचिव डॉ. राजीव सिन्हा यांनी राज्य सरकारच्या मदत बचाव आणि पुनर्वसनाबद्दल ही माहिती दिली. या दोन्ही ठिकाणी लोकांना ठेवण्यात आले आहे. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी सरकारबरोबरच स्वयंसेवी संस्थांची मदत घेतली जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
जोशीमठमधून आतापर्यंत 274 कुटुंबे तात्पुरत्या स्वरूपात विस्थापित झाली आहेत. ताज्या आकडेवारीनुसार विस्थापित कुटुंबातील सदस्यांची संख्या 921 झाली आहे. जिल्हा प्रशासनाने सर्वेक्षणाअंती आतापर्यंत 863 इमारतींना तडे गेल्याचे जाहीर केले आहे. त्यापैकी 181 इमारती असुरक्षित असून त्या पूर्णपणे खाली करण्यात येत आहेत. येथे चार दिवसांपूर्वी झालेल्या बर्फवृष्टीनंतर या घरांमधील तडे वाढले आहेत. मात्र, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी येथे एसडीआरएफच्या तुकडय़ा तैनात करण्यात आल्या आहेत.
जोशीमठमध्ये पाणी विसर्गात घट
जोशीमठमध्ये 6 जानेवारीला सुरुवातीला पाण्याचा विसर्ग 540 लिटर प्रतिमिनिट होता. आता तो 136 लिटर प्रतिमिनिटावर आला आहे. विशेष म्हणजे तीन दिवसांपूर्वी जेपी कॉलनीजवळील भूमिगत जलवाहिनीतून बाहेर पडणाऱया पाण्याचे प्रमाण 150 लिटर प्रतिमिनिट झाले होते, असे आपत्ती व्यवस्थापन विभागाचे सचिव डॉ. राजीव सिन्हा यांनी सांगितले.