कमाल 29 अंश तर किमान 10 अशांवर पारा
प्रतिनिधी/ सातारा
दरवर्षीच पाल, मांढरदेव, औंध या यात्रेदरम्यान थंडीचा कडाका पडतो. तसाच थंडीचा कडाका गेल्या तीन दिवसांपासून वाढलेला आहे. दिवसा थंडी जाणवत आहे. सायंकाळी पाच वाजल्यापासून थंडीची तीव्रता वाढत आहे ते सकाळी 10 वाजेपर्यंत चांगलीच थंडी पडते आहे. जिह्यात महाबळेश्वरसह सर्वच तालुक्यामध्ये गारठा वाढला आहे. सातारा शहरामध्ये कमाल 29 तर किमान 10 अंश सेल्सियसावर पारा आला आहे. त्यामुळे जिल्हावासियांना हुडहुडी भरली आहे. यामुळे उबदार कपडे, गरम पेयांना मागणी वाढली आहे. अजून दोन ते तीन दिवस अशीच थंडी जाणवणार आहे असा अंदाज हवामान तज्ञांनी वर्तवला आहे.
जानेवारी महिन्यामध्ये थंडीचे दरवर्षीच प्रमाण वाढते. गेल्या दोन दिवसांपासून गारठय़ात चांगलीच वाढ झालेली आहे. महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण असून या ठिकाणी थंड हवेचा आनंद घेण्यासाठी मोठय़ा प्रमाणावर पर्यटकांनी हजेरी लावली आहे. त्याचबरोबर सातारा, जावली, पाटण, वाई, खंडाळा, कोरेगाव यासह सर्वच तालुक्यामध्ये थंडीचे प्रमाण वाढलेले आहे. सातारा शहरात सोमवारी रात्रीपासूनच थंडीचे प्रमाण जास्त होते. दरम्यान, वाढत्या थंडीपासून बचाव करण्यासाठी नागरिक उबदार कपडे खरेदी करताना दिसत आहेत. उबदार कपडय़ांना मागणी आहे. सातारा शहरातील अनेक कापड दुकानांनी स्वेटर विक्रीला ठेवलेले असून त्याचे दर वाढवलेले आहेत. त्याचबरोबर दिवसांही चहाला मोठी मागणी होताना दिसत आहे. दिवसासुद्धा गारठा जाणवत असल्याने बहुतांशी जण उन्हाचा आसरा घेताना दिसत होते. ग्रामीण भागात ठिकठिकाणी शेकोटय़ा पेटवल्याचे चित्र दिसत होते.
अजून दोन दिवस गारठा कायम राहण्याचा अंदाज
रब्बी पिकांना गारठा गरजेचा असतो. हरभरा, गहू या पिकांना गारठय़ामुळे वाढ होते. कृत्रिम पाणी दिले तरीही गारठय़ाने पिके चांगली राहतात, असे शेतकऱयांनी सांगितले. दरम्यान, अजून दोन दिवस असाच गारठा कायम राहिल असा अंदाज हवामान तज्ञांकडून व्यक्त करण्यात आलेला आहे.