पुणे : राज्यात यंदा काही भौतिक बदलांमुळे पाऊस उशिरा पडेल, अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस पडत नाही, तोपर्यंत पेरणी करू नये, असे आवाहन राज्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी केले आहे.
राज्यातील कृषी विज्ञान केंद्राची समन्वय बैठक आयोजिक करण्यात आली होती. त्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत कृषीमंत्री भुसे बोलत होते. भुसे म्हणाले, सद्यस्थितीत राज्यात अवघी दीड टक्का पेरणी झाली आहे. गेल्या वर्षी याच दिवशी जवळपस तीन टक्के पेरणी झाली होती. पुरेशा प्रमाणात पाऊस पडल्याशिवाय पेरणी करणे योग्य होणार नाही. कृषी विभागाच्या मदतीने याबाबत आवाहन करण्यात येत आहे. बियाणे, रासायनिक खते, निविष्ठाबाबत वेळोवेळी आढावा घेवून त्याबाबत नियोजन करण्यात येत आहे. बियाणे, खते, रासायनिक खते व इतर निविष्ठा कमी पडणार नाहीत, याबाबतही काळजी घेण्यात येत आहे. आपल्याला याबाबत कुठेही गैरप्रकार आढळून आल्यास कृषी विभागाकडे तक्रार करावी.
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि नवनवीन संशोधन करून कृषी विद्यापीठाच्या उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करावेत. विकेल ते पिकेल, या अभियानानुसार बाजाराच्या मागणीप्रमाणे पीक पद्धती विकसित करावी. तसेच भौगोलिक परिस्थितीचा विचार करून स्थानिक पीक पद्धती विकसित करण्यासाठी काम करावे. सेंद्रिय शेतीला चालना देण्यासाठी त्याबाबत संशोधन करुन सेंद्रिय प्रमाणीकरण अभ्यासक्रम प्रायोगिक तत्त्वावर सुरू करावेत. माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांची जयंती 1 जुलै रोजी कृषी दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या दिनाचे औचित्य साधून गावपातळीपर्यंत शेतकऱ्यांशी संवाद साधण्यात येणार आहेत. तसेच कृषी सप्ताह साजरा करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे. विभागाच्यावतीने मान्सूनचा अंदाज घेऊन शेतकऱ्यांना वेळोवेळी पेरणीबाबत मार्गदर्शन करावे, अशा सूचनाही भुसे यांनी या वेळी केल्या.