अमेरिकेत राहून मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीसाठी अतुलनीय योगदान देणाऱया ‘महाराष्ट्र फाऊंडेशन’चे संस्थापक सुनील देशमुख यांच्या निधनाने एका परिवर्तनवादी, समाजहितैषी साहित्यसेवकास महाराष्ट्र मुकला आहे. अमेरिकेत स्थायिक झाल्यानंतरही आपली नाळ, मूल्यभान कधी तुटू न देणारे व्यक्तिमत्त्व इतकीच देशमुख यांची ओळख सीमित नाही. तर मराठी भाषा, साहित्य, समाजाच्या हिताकरिता त्यांनी ‘महाराष्ट्र फाऊंडेशन’च्या माध्यमातून जे मूलभूत स्वरुपाचे काम करून ठेवले आहे, ते अनन्यसाधारण होय. देशमुख मूळचे सांगलीचे. आपल्या आईकडून सुधारकी वारसा मिळालेल्या देशमुख यांच्यावर सेवा दलाबरोबर साने गुरुजींच्या वाङ्मयाचे तसेच स्वातंत्र्य, समता व बंधुतेचे संस्कार झाले. युक्रांदचे डॉ. कुमार सप्तर्षी, लेखक व पत्रकार अनिल अवचट, सांगलीचे क्रांती शहा अशा थोरामोठय़ांचा प्रभाव त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर पडल्याचे ते सांगत असत. अर्थात ही सारी पूर्वपीठिकाच त्यांच्यात सर्वसमावेशक, व्यापक व परिवर्तनवादी विचार रुजविण्यामध्ये महत्त्वाची ठरली असावी. ‘सुधारक’कार गोपाळ गणेश आगरकर हे कर्ते आणि बोलके सुधारक, यातील भेद सांगत असत. यातील बोलके सुधारक, हे केवळ शब्दांचे बुडबुडे उडविण्यात धन्यता मानतात, तर कर्ते सुधारक प्रत्यक्ष त्या सुधारणा, परिवर्तन घडविण्याकरिता कार्यतप्तर राहतात, याकडे आगरकर अंगुलीनिर्देश करत. सुनील देशमुख अशा कर्त्यासवरत्यांपैकी एक होते. 1964 साली एसएससी परीक्षेत बोर्डात चौथ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाल्यावर शिक्षणासाठी ते मुंबईत आले आणि मुंबई विद्यापीठाच्या केमिकल टेक्नॉलॉजी या विभागातून बी. केम. ही पदवी प्राप्त केल्यानंतर त्यांनी सत्तरच्या दशकात अमेरिकेची वाट धरली. वास्तविक हा कालखंडही तसा झपाटलेला. तेव्हा अमेरिकेत विद्यार्थी चळवळी ऐन भरात होत्या. स्वाभाविकच भारतातील मूल्यभानाला साजेसेच वातावरण देशमुख यांना लाभले. त्यामुळे त्यांच्यातील समाज वा साहित्यसेवक सतत जागता राहिला. त्यामुळेच अमेरिकेमध्ये एम.एस.,एमबीएसह कायद्याची पदवी, वॉलस्ट्रीटवरील बडय़ा पगाराची नोकरी अशा एकेक पायऱया चढत यशाच्या अत्युच्च शिखरावर पोहोचल्यानंतरही त्यात ते गुंतून पडले नाहीत. तेथील झगमगाट वा पैशाच्या मागे न लागता त्यांनी पर्यावरणासह धर्मनिरपेक्षतावादी व परिवर्तनवादी चळवळीत स्वतःला झोकून देण्याची धमक दाखविली. समाजासाठी काही तरी करायला हवे, हाच त्यांचा ध्यास होता. त्यामुळेच ही लठ्ठ पगाराची नोकरी एका क्षणात सोडण्याचे धारिष्टय़ त्यांनी दाखविले. संपत्तीवर्धनाऐवजी समाजहित, पर्यावरण संवर्धनाची भूमिका घेऊन असा घाटय़ाचा मार्ग आज कोण पत्करेल? त्याकरिता पराकोटीची संवदेनशीलता, समाजाबद्दल कळकळ हवी. देशमुख यांच्यामध्ये हे माणूसपण काठोकाठ भरलेले होते. त्यामुळे ते वेगळी वाट धरू शकले. ‘महाराष्ट्र फाऊंडेशन’ व त्यामाध्यमातून त्यांनी केलेल्या कार्याला निश्चित तोड नाही. मुख्य म्हणजे हे करताना कोणताही गाजावाजा त्यांनी केला नाही. प्रामाणिक व प्रसिद्धीपराङ्मुख दृष्टीकोनातूनच स्वतःच्या एक कोटी रुपयांच्या निधीतून ‘महाराष्ट्र फाउंडेशन’तर्फे (अमेरिका) 1994 पासून ‘साहित्य पुरस्कारा’ची मुहूर्तमेढ त्यांनी रोवली. तर त्यात आणखी एक कोटी रुपयांची भर घालून 1996 पासून ‘सामाजिक कार्य पुरस्कार’ सुरू करण्याची दूरदृष्टी दाखविली. 2008 पर्यंत या पुरस्कारांची निवड व वितरण कार्यवाही मुंबई येथील ‘केशव गोरे स्मारक ट्रस्ट’मार्फत होत असे. सध्या ते ‘मासुम संस्था’ व ‘साधना ट्रस्ट’कडून होते. विशेष म्हणजे दरवषी दहा ते अकरा याप्रमाणे गेली 28 वर्षे पुरस्कार नित्यनेमाने व विनाखंड हे पुरस्कार दिले जातात. समाजभान असलेल्या साहित्यिकांबरोबरच सच्चे कार्यकर्ते, संस्थांना सन्मानित करण्याचा वा प्रेरणा देण्याचा हा उपक्रम केवळ स्तुत्यच नव्हे; तर अत्यावश्यक असल्याचीच पुष्टी देतो. देशमुख यांनी पर्यावरण क्षेत्रातही योगदान दिल्याचे पहायला मिळते. युएसमध्ये पर्यावरण संरक्षणासाठी कार्य करणाऱया सर्वांत जुन्या ‘सियारा क्लब’मार्फत भारतामध्ये पर्यावरणाच्या संवर्धनाचे कार्य करणाऱया संस्थांना एक लाख डॉलर्सचा पुरस्कार देण्याच्या योजनेचेही ते शिल्पकार ठरतात. त्यासाठी करावयाच्या निधी संकलन समितीचे प्रमुख म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली. आज पर्यावरण क्षेत्रात अनेक व्यक्ती, संस्था कार्यरत आहेत. त्यांना बळ देण्याचे देशमुख यांनी केलेले कामही अजोड होय. याचबरोबर महिला सक्षमीकरणासाठी अमेरिकेत केलेल्या कामाबद्दल त्यांना न्यूयॉर्कमधील ‘टाइम स्क्वेअर’मध्ये श्रीमती हिलरी क्लिंटन यांच्यासमवेत ‘फुल वीक सॅल्यूट’चा सन्मान प्राप्त झाला होता. स्त्री शिक्षण, अंधश्रद्धा निर्मूलन, जातनिर्मूलन यांसारख्या विषयांवरील त्यांचे विचार अत्यंत स्वच्छ व पारदर्शक होते. त्यामुळेच परिवर्तनवादी विचारांच्या साहित्यिक, विचारवंत, सामाजिक कार्यकर्त्यांना ताकद देण्यात ‘महाराष्ट्र फाऊंडेशन’चा कटाक्ष राहिल्याचे दिसून येते. ‘माझा पुनर्जन्मावर विश्वास नाही. तुम्हाला जगण्यासाठी एक जन्म मिळाला आहे. तो तुम्ही चांगला पद्धतीने जगा. समाजासाठी चांगले काम करा आणि जगण्याचा आनंदही घ्या,’ असे देशमुख म्हणत असत. हा विचार ते तंतोतंत जगले. सामाजिक न्यायावर त्यांचा ठाम विश्वास होता. मी नास्तीक आहे. धर्म वगैरे संकल्पना समाजातील दुर्बलांना वा स्त्रियांना वश करण्यासाठी निर्माण केल्या असल्याचेही परखड विवेचन ते करत. कुणास पटो न पटो. त्यांचे जीवनविषयक तत्त्वज्ञान हे मानवता केंद्रित, धर्मनिरपेक्ष होते. सातासमुद्रापार जाऊनही या माणसाने माणुसकी, माणूसपण कधी सोडले नाही. अमेरिकेत जाऊन स्थायिक होणाऱया नव्या पिढीने यातून नक्कीच आदर्श घ्यावा. आज एक खराखुरा आधारवड आपण गमावला असला, तरी त्यांचे विचार कायमच समाजाला दिशा देत राहतील. सुनील देशमुख यांना भावपूर्ण आदरांजली!
Previous Articleआणखी एका जैन संतांचा प्राणत्याग
Next Article ट्विटरच्या युजर्सचा डाटा चोरीला
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.