तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांचा केंद्र सरकारला सल्ला ः देशाला धोका निर्माण होणार
वृत्तसंस्था / चेन्नई
तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी इतिहासात फेरफार करण्याचा प्रकार देशासाठी धोकादायक असल्याचे म्हटले आहे. काही लोक ‘काल्पनिक कहाण्यां’ना इतिहासाच्या स्वरुपात सादर करू पाहत आहेत, अशा लोकांपासून सतर्क राहण्याची गरज असल्याचे स्टॅलिन यांनी ‘इंडियन हिस्ट्री काँगेस’च्या 81 व्या वार्षिक अधिवेशनाला संबोधित करताना नमूद केले आहे. तसेच यावेळी त्यांनी केंद्र सरकारने धर्मनिरपेक्ष म्हणून कायम राहण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले आहे.
इतिहासाचे अध्ययन पेल्याने आमच्यासाठी आकर्षक भवितव्य निश्चित होणार का असा विचार अनेक जण करतात. परंतु इतिहासाचे अध्ययन केवळ पदवी आणि वेतन प्राप्त करण्यासाठी केले जाऊ नये. आपल्याबद्दल जाणून घेण्यासाठी इतिहासाचे अध्ययन केले जावे. भूतकाळाचे अध्ययन केलेले लोकच वर्तमानात इतिहास रचू शकतात आाणि पुढील काळाबद्दल भविष्यवाणी करू शकात. अशाप्रकारचा इतिहास हा विज्ञानआधारित असायला हवा. परंतु काही लोक काल्पनिक कहाण्यांना इतिहास ठरवत आहेत. अशा लोकांवर विश्वास ठेवून मूर्ख होऊ नये असे स्टॅलिन यांनी म्हटले आहे.
इतिहासातील फेरफारामुळे देशासमोर धोका निर्माण झाला आहे. शिक्षण, भाषा, संस्कृती, अर्थव्यवस्था आणि प्रशासनात घटनेच्या प्रतिष्ठेचे रक्षण केले जावे. केवळ राजे-महाराजे, त्यांची जीवनशैली अणि विजयाची चर्चा नमूद असेल अशाप्रकारचा दस्तऐवज म्हणजे इतिहास नव्हे. इतिहासात सर्व क्षेत्रांच्या लोकांना देखील प्रतिबिंबित केले जावे असे स्टॅलिन म्हणाले.