पंतप्रधान मोदींची भाजप कार्यकर्त्यांना सूचना, गेल्या आठ वर्षात विकासाला प्राधान्य
वृत्तसंस्था/ जयपूर
भाजप-रालोआच्या केंद्र सरकारने गेली आठ वर्षे देशाच्या विकासालाच प्राधान्य दिले आहे. त्याचप्रमाणे सामाजिक न्याय आणि सुप्रशासन यांच्यावर भर दिला आहे. त्यामुळे विरोधक निराश झाले असून त्यांनी देशात जातीयवाद वाढविण्याचा प्रयत्न चालविला आहे. जातीभेदावर आधारित समाजव्यवस्थेची इकोसिस्टीम तयार करण्याच्या त्यांच्या या जाळय़ात भाजपच्या कार्यकर्त्यांनी अडकू नये. त्यांनी सरकारने केलेल्या विकासाची जाणीव जनतेला करून द्यावी, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजप कार्यकर्त्यांना केले आहे.
जयपूर येथे भाजपच्या कार्यकर्त्यांची बैठक सध्या सुरू आहे. या बैठकीला पंतप्रधान मोदींनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संबोधित केले. भारतीय जनता पक्षाने पुढील 25 वर्षांसाठी आपली ध्येयधोरणे निश्चित करावीत. विकासासाठी किंवा राजकीय यशासाठी शॉर्टकट शोधण्याचा प्रयत्न करू नये. अविरत कष्टातूनच या दोन बाबी साध्य होत असतात, असेही प्रतिपादन त्यांनी केले.
विरोधकांचे डावपेच
भाजप विकासावर आधारित ध्येयधोरणे राबवित असताना विरोधी पक्ष मात्र देशाच्या भवितव्याशी त्यांच्या क्षुल्लक स्वार्थासाठी खेळत आहेत. जाती-जातींमध्ये तणाव निर्माण करून समाजात फूट पाडण्याचा त्यांचा उद्योग आहे. जातीच्या नावाने विषपेरणी सुरू आहे. प्रादेशिकता वादाला पुन्हा चालना देण्याचे काम सुरू आहे. अशा स्थितीत हे प्रयत्न हाणून पाडणे हे भाजप कार्यकर्त्यांचे काम असून ‘एक भारत श्रे÷ भारत’ हा मंत्र समाजात रुजविण्याचा प्रयत्न त्यांनी करावा. तसेच संकुचित शक्तींपासून देशाला सावध करण्यासाठी प्रयत्न करावेत. जनसंघाच्या काळापासून भाजप राष्ट्रवाद आणि देशभक्तीवर आधारित धोरणांची पाठराखण करीत आहे, असे आवाहन त्यांनी नेत्यांना उद्देशून केले.
विकासाच्या आधारावर अग्रेसर
राजकीय यशासाठी भाजपला अल्पकालीन तडजोडी करण्याची गरज नाही. भाजपची वाट रोखण्याचे असंख्य प्रयत्न आजवर करण्यात आले आहेत. तथापि, भाजपची प्रगती आणि विस्तार उत्तरोत्तर सुरूच राहिला आहे. देशाच्या स्वातंत्र्याची पंच्याहत्तरी भाजपच्या कार्यकाळात साजरी होत आहे. ‘आजादी का अमृत महोत्सव’ या व्यापक कार्यक्रमांतर्गत आम्ही आमची विकासकार्ये लोकांपर्यंत पोहोचवित आहोत. आपली ध्येयधोरणे लघुकालीन असता कामा नयेत. पुढील 25 वर्षांचा विचार करून आज पायाभरणी केल्यास दीर्घकालीन विकासाचे स्वप्न साकार होणार आहे. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी हा दृष्टीकोन ठेवला पाहिजे. या महिन्याच्या अखेरीस केंद्रातील भाजप-रालोआ सरकारला आठ वर्षे पूर्ण होत आहेत. या काळातील उपलब्धी लोकांच्या अनुभवात येत असून भाजपच्या पाठिंब्यामध्ये वाढ होत आहे. कार्यकर्त्यांचा उत्साह वाढविणाऱयाच या बाबी आहेत, असेही त्यांनी आवर्जून नमूद केले.
2014 साली सत्तेवर आल्यानंतर अनेक पायाभूत बाबी आम्हाला कराव्या लागल्या. त्यापूर्वीची अनेक दशके या मूलभूत बाबींकडे हेतूपुरस्सर दुर्लक्ष करण्यात आले होते. त्यामुळे विकासाचा पाया ठिसूळ राहिला होता. या उणिवा दूर करून दीर्घकालीन विकासाच्या दिशेने आता वाटचाल होत आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.
एकही त्रुटी ठेवू नका
सरकारने गोरगरीब आणि दुर्बल घटकांसाठी अनेक व्यापक योजना क्रियान्वित केल्या आहेत. एकही गरीब या योजनेच्या लाभांपासून वंचित राहाता कामा नये, याची सुनिश्चिती भाजप नेते आणि कार्यकर्त्यांनी केली पाहिजेत. सरकारच्या योजनांमध्ये अधिकाधिक नागरिकांचा सहभाग असेल, हे पाहिले पाहिजे. तरच या योजना यशस्वी होतील, असे त्यांनी प्रतिपादन केले.