एरिक्सन, डेलसह अन्य कंपन्यांचा यामध्ये समावेश : मार्च महिन्यातील कंपन्यांची स्थिती : अमेरिका, आशियात कारवाई
नवी दिल्ली :
तंत्रज्ञान क्षेत्रातील खर्च कपातीचा एक भाग म्हणून कर्मचाऱ्यांची कपात करण्याचे काम मार्चमध्येही सुरू राहिले आहे. यात पाच जागतिक तंत्रज्ञान कंपन्यांनी या महिन्यात 8,000 हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. यामध्ये अॅपल, आयबीएम, डेल आणि एरिक्सन यांचा समावेश आहे.
या महिन्याच्या 25 तारखेला, दूरसंचार उपकरणे कंपनी एरिक्सनने स्वीडनमधील 1,200 कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची घोषणा केली. कंपनीचा हा निर्णय यावर्षी कॉस्ट कटिंग लक्षात घेऊन घेण्यात आला आहे. यामध्ये सल्लागारांची कपात, प्रक्रिया पुनर्रचना आणि सुविधा यांचा समावेश आहे. गेल्या वर्षीही कंपनीने 8,500 कामगारांना कामावरून काढून टाकले होते.
अॅपलने मायक्रो एलइटे प्रकल्प बंद केला. अॅपलने या महिन्यात एक महागडा संशोधन आणि विकास प्रकल्प थांबवला आहे. कंपनीने भविष्यातील अॅपल वॉच मॉडेल्ससाठी मायक्रो एलईडी डिस्प्ले विकसित करण्याचे प्रयत्न थांबवले आहेत. यासाठी अॅपलने डिस्प्ले इंजिनिअरिंग टीमची पुनर्रचना केली, ज्यामुळे अमेरिका आणि आशियामध्ये मोठ्या प्रमाणावर नोकऱ्या कमी झाल्या.
डेलने केली कर्मचारी कपात
तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनी : खर्चावर नियंत्रणासाठी निर्णय
बेंगळूर :
तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनी डेल टेक्नॉलॉजी या कंपनीकडून दुसऱ्यांदा कर्मचारी कपातीचे धोरण राबवले असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. अलीकडच्या काळामध्ये कंपनीने जवळपास 6 हजार कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले असल्याचेही सांगितले जात आहे. याआधी मागच्या वर्षी कंपनीने 6 हजारहून अधिक कर्मचाऱ्यांना कमी केले होते.
सध्याला कंपनीकडे असणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या 1 लाख 20 हजार इतकी आहे. याआधी कंपनीकडे एक लाख 26 हजार कर्मचारी कार्यरत होते. खर्चामध्ये झालेल्या वाढीच्या कारणास्तव डेल कंपनीने कर्मचारी कपात केली असल्याचे बोलले जात आहे. नव्याने भरती करण्यात येणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्यादेखील कमी केली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
सध्याच्या काळात स्पर्धात्मक युगात पर्सनल कॉम्प्युटरची मागणी कमी झाल्याने कंपनीला चिंता सतावत आहे. यातूनच कर्मचारी कपातीचे धोरण राबवले गेल्याचे समजते. मागच्या वर्षीच्या शेवटच्या तिमाहीमध्ये कंपनीच्या महसुलामध्ये 11 टक्के इतकी घसरण दिसून आली. सध्या कच्च्या मालासाठी आणि इतर गोष्टींसाठी ज्यादा पैशांची मोजणी करावी लागते आहे. त्यामुळे खर्चामध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. यातूनच महसुलावरदेखील नकारात्मक परिणाम जाणवताना दिसतो आहे.