महानगरपालिका लक्ष देणार का?
बेळगाव : शहरामध्ये पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली असताना कोनवाळ गल्ली येथे ड्रेनेजचे पाणी काही विहिरींना मिश्रित होत असल्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे. याबाबत महानगरपालिकेकडे तक्रार केली असता केवळ ड्रेनेज साफ केल्याचे दाखविण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप येथील जनता करत आहे. या गंभीर प्रकाराकडे महानगरपालिकेने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे. रेडिओ कॉम्प्लेक्सच्या मागील बाजूस असलेल्या कोनवाळ गल्लीतील 3 ते 4 विहिरींना ड्रेनेजे पाणी मिश्रित होत आहे. त्यामुळे या परिसरात पाण्याची समस्या गंभीर बनू लागली आहे. एक तर वेळेत पाणी सोडले जात नाही आणि घरांच्या पाठीमागे असलेल्या विहिरींना ड्रेनेजचे पाणी जात असल्याने ते पाणी वापरणे अशक्य झाल्याचे मनोहर लोकुळकर यांनी सांगितले. सध्या या परिसरात पाण्याची टंचाई आहे. यातच विहिरींचे पाणी खराब झाल्याने आम्हाला साऱ्यांना टँकरचा आधार घ्यावा लागत आहे. याबाबत संबंधित कर्मचाऱ्यांना सूचना केली तर केवळ ड्रेनेज चेंबर साफ केल्याचे दाखविले जात आहे. मात्र ती गळती काढण्यासाठी ठोस पाऊलच उचलले जात नाही. याबद्दल लोकुळकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. महानगरपालिकेने या प्रकाराकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.