-खेडमधील प्रकार, पोलीस तपासात उघड
पतिनिधी/खेड
चोरांनी अपहरण करून परजिल्ह्यात ठेवले असून त्यांच्या तावडीतून सुटका करून घेतल्याचा बनाव केल्याचा प्रकार एका महाविद्यालयात शिकणाऱ्या १७ वर्षीय विद्यार्थ्याने केल्याचे येथील पोलिसांच्या तपासाअंती उघड झाले आहे. या विद्यार्थ्याचे पोलिसांनी समूपदेशन करत गुरुवारी नातेवाईकांच्या ताब्यात दिले. इयत्ता १२ वीच्या शिक्षणात मन लागत नसल्यानेच हा बनाव केल्याचे समोर आले आहे.
अधिक माहिती अशी की, बुधवारी एका महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्याच्या पुतण्याने येथील पोलीस स्थानकात १७ वर्षीय युवकाचे अपहरण झाल्याची खबर दिली. याचवेळी पुतण्याच्या भ्रमणध्वनीवर अपहारित मुलाने भयभीत आवाजात सांगत कशीबशी सुटका करून घेत एका ठिकाणी आश्रय घेत असल्याचे सांगितले. त्यानंतर संपर्कच तुटल्याने सारेच काळजीत पडले. ही बाब पोलीस स्थानकात कळवल्यावर घटनेचे गांभीर्य ओळखत या बाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक सुजित गडदे यांनी वरिष्ठांना कळवले.
त्यानुसार जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली एक विशेष पोलीस पथक तयार करण्यात आले. या पथकाने शेजारील जिल्ह्यातील सर्व हॉटेल्स व विश्रामगृह यांची तपासणी केली असता १७ वर्षीय युवकास शोधण्यात रत्नागिरी पोलिसांना यश आले. त्याच्याकडे अपहरणाबाबत पोलिसांनी विचारणा केली असता धक्कादायक माहिती समोर आली. इयत्ता १२ वीच्या शिक्षणात रस नसून आय.आय.टी. शिक्षण घ्यायचे होते. मात्र, ही बाब घरातील कोणालाही सांगू शकत नव्हतो. याचमुळे नैराश्यातून घर सोडण्याचा निर्णय घेत अपहरणाचा बनाव केल्याची कबुली पोलिसांसमोर दिली. यामुळे अपहरणाबाबतच्या तक्रारीला पूर्णविराम मिळाला आहे.