पाकिस्तानमध्ये 9 बळी : 6.6 तीव्रतेचा भूकंप, अफगाणिस्तानात केंद्रबिंदू
वृत्तसंस्था नवी दिल्ली
भारत, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये मंगळवारी रात्री 10.15 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपमापन यंत्रावर त्याची तीव्रता 6.6 रिश्टर स्केल इतकी मोजली गेली. भूकंपाचा केंद्रबिंदू अफगाणिस्तानच्या फैजाबादपासून 133 किमी आग्नेय दिशेला जमिनीपासून 156 किमी खोलीवर होता. पाकिस्तानमध्ये 9 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली असून 302 जण जखमी झाले आहेत. अफगाणिस्तानातही दोन जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. भारतात या भूकंपामुळे जीवितहानी झाली नसली तरी उत्तर भारतातील बहुतांश राज्यांमध्ये जाणवलेल्या तीव्र हादऱ्यांमुळे लोकांमध्ये दहशत व भीती पसरली होती.
मंगळवारी रात्री झालेल्या भूकंपाचे धक्के भारतातही जाणवले. या नैसर्गिक आपत्तीत दिल्ली, राजस्थान, पंजाब, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश आणि जम्मू-काश्मीर हादरले. रात्री दहा वाजल्यानंतर ऐन झोपी जाण्याच्या सुमारास जाणवलेल्या हादऱ्यांमुळे लोकांमध्ये घबराट निर्माण झाली होती. जीव वाचवण्यासाठी लोक घाबरून घराबाहेर पडले. दिल्ली-एनसीआर, गाझियाबादमधील अनेक भागात लोकांनी भीतीपोटी संपूर्ण रात्र घराबाहेर काढली.
उत्तराखंडमध्ये दोन महिन्यात 16 वेळा हादरे
उत्तराखंडमध्ये गेल्या दोन महिन्यात छोट्या-मोठ्या भूकंपांमुळे 16 वेळा पृथ्वी हादरली आहे. मंगळवारी रात्री पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के बसल्याने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले. भूकंपाचे केंद्र अफगाणिस्तान असूनही उत्तराखंडमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. याआधीही शास्त्रज्ञांनी अनेकवेळा उत्तराखंडमध्ये मोठा भूकंप येणार असल्याचे सांगितले आहे. अलीकडेच सिंगापूरच्या एशियन सिस्मोलॉजिकल कमिशनचे संचालक परमेश बॅनर्जी यांनी उत्तराखंडमध्ये दीर्घकाळ कोणताही मोठा भूकंप झालेला नसल्यामुळे तीव्र हादऱ्यांचा अंदाज वर्तवला होता. उत्तराखंडमध्ये गेल्या पाचशे वर्षांत एकही मोठा भूकंप झालेला नाही.
राजस्थान, मध्यप्रदेशमध्येही भूकंपाची जाणीव
मध्यप्रदेशातील ग्वाल्हेर, भोपाळमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले. लोकांना काही सेकंदांसाठी हादरे जाणवले. शहरातील उंच इमारतींमध्ये राहणारे लोक रस्त्यावर आले. भूकंपामुळे लोकांमध्ये घबराट पसरली होती. राजस्थानात जयपूर, सीकर, करौलीसह अनेक जिह्यांमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले. येथेही लोक घराबाहेर पडले. त्यानंतर त्यांनी एकमेकांना फोन करून भूकंपाची माहिती दिली. बिकानेर, जोधपूर, अलवर, गंगानगर, अजमेर, झुंझुनू येथेही लोक घराबाहेर धावले. दिल्लीसह पंजाब, जम्मू-काश्मीर, उत्तर प्रदेश आणि उत्तर भारतातील इतर भागातही अशीच परिस्थिती होती.