मोहोळ,प्रतिनिधी
Accident News : ईको कारला अज्ञात वाहनाने समोरुन जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात चार जण ठार तर सहा जण गंभीर जखमी झाले.हा अपघात बुधवार २३ ऑगस्ट रोजी पहाटे साडेचार वाजता सोलापूर पुणे महामार्गावर मोहोळ तालुक्यातील यावली गावच्या नजीक घडला.आदमअली मुनावरअली शेख (वय- ३७) वर्षे, हिराबाई रामदास पवार (वय -७५), कमलाबाई मारूती वेताळ (वय- ६०), द्वारकाबाई नागनाथ गायकवाड (वय – ४०) (सर्व रा. राजनगाव मशीद, ता. पारनेर जि. अहमदनगर) अशी मृतांची नावे आहेत. तर बाळी बाबु पवार (वय-२७), छकुली भिमा पवार (वय – २७), साई योगीराज पवार (वय -७), मंदाबाई नाथा पवार (वय -५२), सुरेखा भारत मोरे (वय- ४५), बायजाबाई रामदास पवार (वय -६०) (सर्व रा. राजनगाव मशीद) अशी जखमींची नावे असून त्यांच्यावर सोलापूर येथील सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघाताची नोंद मोहोळ पोलिसात करण्यात आली आहे.
याबाबत मोहोळ पोलीस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, बुधवार २३ ऑगस्ट रोजी अहमदनगर जिल्ह्यातील इको कार सोलापूर पुणे महामार्गावरून सोलापूरच्या दिशेने जात होती. सदरची कार मोहोळ तालुक्यातील यावली गावच्या शिवारात आली असता, भरदा वेगात समोरून आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांच्या कारला जोराची धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये कारचालक आदमअली मुनावरअली शेख, हिराबाई रामदास पवार, कमलाबाई मारूती वेताळ हे जागीच ठार झाले. तर द्वारकाबाई नागनाथ गायकवाड यांचा उपचारा दरम्यान सिव्हिल हॉस्पिटल सोलापूर येथे मृत्यू झाला.
जखमींवरती सोलापूर येथील रुग्णालयात उपचार सुरू असून एकाची प्रकृती चिंताजनक आहे.याप्रकरणी सावळेश्वर टोळनाक्याचे पेट्रोलींग ऑफीसर मलिकार्जुन बळीराम बजुलगे यांनी मोहोळ पोलिसात दिलेल्या खबरीवरून मोटार अपघाताची नोंद करण्यात आली आहे. या घटनेमुळे अहमदनगर जिल्ह्यातील रांजणगाव मशीद गावावर शोककळा पसरली आहे.