ऑनलाईन टीम / तरुण भारत :
शरद पवार यांच्या तोंडी नेहमी साखरेचा गोडवा असतो. ते अनुभवी नेते आहेत, त्यांनी राज्यात आणि देशात अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. त्यांचं योगदान मोठं आहे. म्हणून कुठला माणूस सत्तेवर आहे, हे न पाहता, राज्याच्या हितासाठी ते नेहमी मार्गदर्शन करत असतात. जेव्हा-जेव्हा आवश्यकता असते, तेव्हा-तेव्हा ते मला फोन करुन सूचना आणि मार्गदर्शन करत असतात. त्यांचं सहकार क्षेत्रातील योगदान नाकारता येणार नाही, अशा शब्दात शिंदे यांनी पवारांवर स्तुतीसुमनं उधळली.
वसंतदादा शुगर इन्स्टिटय़ूटच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार एकाच मंचावर आले होते. त्यावेळी सभेला संबोधित करताना म्हणाले, तीनच दिवसांपूर्वी मी दावोसला जाऊ आलो. शरद पवार अनुभवी आहेत, त्यांना माहिती आहे. कुणी काही म्हटलं तरी सुद्धा तिथून आपल्या राज्यासाठी भरपूर गुंतवणूक आणली आहे, त्याची अंमलबजावणी होणार आहे. त्यांची गुंतवणूक राज्यातील वेगवेळय़ा भागात होणार आहे.
शरद पवारांचं सहकार क्षेत्रात मोठं योगदान आहे. ते कोणालाही नाकारता येणार नाही. या क्षेत्रात अजूनही काही अडचणी आहेत, त्या दूर झाल्या पाहिजेत. यासाठी मी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे मदत मागणार असल्याचेही त्यांनी सांगितले.