केंद्रीय निवडणूक आयोगाची माहिती ः उमेदवाराचा शोध अधिक तीव्र होणार
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
देशाच्या उपराष्ट्रपतीपदासाठी 6 ऑगस्ट रोजी निवडणूक होणार आहे. याबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाने बुधवारी कार्यक्रमाची घोषणा केली. देशाचे विद्यमान उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचा कार्यकाळ 11 ऑगस्ट रोजी संपत आहे. याआधी देशाच्या नव्या उपराष्ट्रपतींच्या निवडीची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. तत्पूर्वी देशात राष्ट्रपतीपदाची निवडणूक 18 जुलैला होणार असून 21 जुलैला निकाल लागणार आहे. भाजप आणि विरोधकांनी यापूर्वीच राष्ट्रपतीपदाचे उमेदवार जाहीर केल्यानंतर आता उपराष्ट्रपतीपदासाठी चेहऱयांचा शोध अधिक तीव्र होणार आहे.
उपराष्ट्रपती निवडणुकीची अधिसूचना 5 जुलै रोजी जारी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. यासाठी 19 जुलैपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. 20 जुलै रोजी उमेदवारी अर्जांची छाननी होणार असून उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख 22 जुलै आहे. आयोगाने मतदानासाठी 6 ऑगस्ट ही तारीख निश्चित केली असून त्याचदिवशी मतमोजणी होणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार आणि निवडणूक आयुक्त अनुप चंद्र पांडे यांच्या बैठकीत उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले. उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी लोकसभा आणि राज्यसभेचे सदस्य मतदान करू शकणार आहेत.
उमेदवार निश्चितीसाठी भाजपचे मंथन
उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवार ठरविण्यासाठी भाजपमध्ये वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू झाली आहे. उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवार उत्तर, पश्चिम किंवा ईशान्य भारतातील कोणत्याही राज्यांतून असण्याची शक्यता आहे. सदर राज्यांच्या वेगवेगळय़ा नावांवर मंथन सुरू आहे. देशाच्या इतिहासात आतापर्यंत एकही महिला उपराष्ट्रपती झालेली नाही. त्यामुळे महिलेच्या नावावरही विचार होऊ शकतो. सध्या राष्ट्रपतीपदासाठी भाजपने द्रौपदी मुर्मू यांची निवड केली आहे. त्यानंतर उपराष्ट्रपतीपदासाठीही महिलेची निवड झाल्यास देशात इतिहास घडण्याची शक्मयता नाकारता येत नाही.