काही ठिकाणी अव्वाच्या सव्वा बिल आकारणी
बेळगाव : हेस्कॉमच्या काही कर्मचाऱ्यांकडून सदोष मीटर रिडींग करण्यात आल्याने वीजबिलात वाढ झाल्याची तक्रार ग्राहकांमधून केली जात आहे. कर्मचाऱ्यांच्या चुकीमुळे ग्राहकांना आर्थिक फटका बसत आहे. ज्या ग्राहकांनी हेस्कॉम कार्यालय गाठून शहानिशा केली, त्यावेळी मीटर रिडींग सदोष असल्याचे समजून आले. त्यामुळे मीटर रिडींग योग्य आहे की नाही, हे आता ग्राहकांना तपासावे लागणार आहे. राज्य सरकारकडून घरगुती ग्राहकांसाठी गृहज्योती योजना अंमलात आणली आहे. यामुळे विद्युतबिल 0 रुपये अथवा मर्यादित स्वरुपात येत होते. परंतु, उन्हाळ्याच्या दिवसात इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर वाढल्यामुळे बिलात वाढ होत आहे. बऱ्याच ग्राहकांना मीटर रिडींगबाबत तितकीशी माहिती नसल्याने मीटर रीडरने किती युनिटचा बिलात समावेश केला आहे, याची माहिती नसते. काहीवेळा घर बंद अथवा घराचे प्रवेशद्वार बंद असल्याने मीटर रीडर अंदाजे रिडींग घेत असतो. लक्ष्मी रोड, शहापूर येथील एका ग्राहकाला 132 युनिट वीज वापरल्याबद्दल भरमसाट बिल देण्यात आले होते. तो ग्राहक प्रत्येक महिन्याला 30 ते 40 युनिट वीज वापरतो. असे असताना 132 युनिट रिडींग झालेच कसे? असा प्रश्न अधिकाऱ्यांसमोर उपस्थित केला. रिडींगची शहानिशा केली असता 40 युनिटपेक्षा कमी रिडींग झाल्याचे स्पष्ट झाले. असेच प्रकार भाग्यनगर येथेही झाले आहेत. त्यामुळे ज्या ग्राहकांनी शहानिशा न करताच बिल भरले, त्यांना आर्थिक तोटा सहन करावा लागला.
रिडींगची फेरतपासणी गरजेची
मीटर रीडरने योग्य रिडींग घेतले की नाही, याची तपासणी ग्राहकांनी करणे गरजेचे आहे. सध्या सर्वत्र डिजिटल मीटर बसविण्यात आले असल्याने मीटरवरील काळे बटण दाबताच रिडींगविषयीची संपूर्ण माहिती उपलब्ध होत आहे. विद्युतबिलात अचानक वाढ झाल्यास रिडींगची फेरतपासणी करणे महत्त्वाचे आहे.