जनतेने खबरदारी घेण्याचे रेल्वे खात्याचे आवाहन
प्रतिनिधी/ बेळगाव
मिरज-लोंढा या रेल्वेमार्गावरील कुडची-मिरज या विभागात विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले असून 15 जूनपासून या रेल्वेमार्गावर उच्चविद्युतदाबाने वीजप्रवाह सुरू केला जाणार आहे. 25 केव्हीएसी इलेक्ट्रिक ट्रॅक्शनची सुरुवात होणार असल्याने नागरिक, तसेच पादचाऱ्यांनी याची खबरदारी घ्यावी, असे आवाहन नैर्त्रुत्य रेल्वेने प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
भारतीय रेल्वेकडून देशातील महत्त्वाच्या रेल्वेमार्गांचे विद्युतीकरण केले जात आहे. बेळगाव ते बेंगळूर या रेल्वेमार्गाचे सहा महिन्यांपूर्वीच विद्युतीकरण झाले आहे. मिरज ते बेळगाव या भागात काही ठिकाणी विद्युतीकरणाचे काम अपुरे होते. त्यापैकी कुडची-मिरज या टप्प्यातील विद्युतीकरणाचे काम पूर्ण करण्यात आले आहे. 15 जूनपासून या मार्गावरील सर्व क्रॉसिंगवर विद्युतवाहिन्या कार्यान्वित केल्या जाणार आहेत. त्यामुळे रेल्वेरूळावरून चालत जाणे, तसेच विद्युतवाहिन्यांना स्पर्श करणे धोक्याचे ठरू शकते.
विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्यास कोल्हापूर-तिरुपती हरिप्रिया एक्स्प्रेस, मिरज-बेंगळूर चन्नम्मा एक्स्प्रेस विद्युत इंजिनावर धावू शकतात. सध्या काही एक्स्प्रेस बेळगावमधून दक्षिण भारतात विद्युत इंजिनावर धावत आहेत. त्यामुळे भविष्यात मिरजमधूनही विद्युत इंजिनवर एक्स्प्रेस धावणार आहेत.