हजारोंच्या संख्येने म्हादईप्रेमींची उपस्थिती : राज्यातील इतरही नद्यांसाठी चळवळ उभारा,प्रा. राजेंद्र केरकर यांचे आवाहन
प्रतिनिधी /डिचोली
‘आमची म्हादय आमका जाय’ या घोषणांनी दणाणून निघालेल्या विर्डी साखळी येथील ‘सेव्ह म्हादय, सेव्ह गोवा’ सभेत हजारोंच्या संख्येने लोकांनी म्हादई बचावाचा एल्गार केला. साखळी नगरपालिका मैदानावर आयोजित सदर बैठकीला झालेला पध्दतशीर विरोध आणि नंतर सदर सभा साखळी पालिका क्षेत्रातच घेण्यासाठी आयोजकांनी बांधलेला चंग यामुळे ही सभा भलतीच यशस्वी झाली. या सभेत केंद्र सरकारने कर्नाटकच्या डिपीआरला दिलेली मंजूरी लवकरात लवकर रद्द करावा, राज्य सरकारने कोणताही निष्काळजीपणा न दाखवता व कोणत्याही दबावाला बळी न पडता या आंदोलनाला पाठिंबा द्यावा, असे दोन ठराव घेण्यात आले. या ठरावांना उपस्थित हजारोंच्या संख्येने लोकांनी टाळ्यांच्या गजरात अनुमोदन दिले.
सांखळीचे नगराध्यक्ष राजेश सावळ यांनी आपल्या खासगी जागेतच या सभेचे अखेर आयोजन केले. सभेला सहा विरोधी आमदार तसेच विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध समजासेवी संघटनांचे प्रतिनिधी, पर्यावरणप्रेमी, म्हादईप्रेमी व जागरूक नागरिकांची उपस्थिती होती. सभेच्या ठिकाणी उपस्थित प्रत्येकांच्या तोंडावर केवळ म्हादई वाचवा राज्य वाचवा, याच घोषणा होत्या. म्हादईचा
उत्तर व दक्षिण गोव्याला बसणार फटका
म्हादईचे पाणी हे हुबळी धारवाड भागातील लोकांना पिण्यासाठी पाहिजे, असा बनाव करून कर्नाटक सरकार हे पाणी तेथील शेती बागायतीसाठी नेत आहे. कर्नाटकाच्या आमदार व खासदारांनी तयार केलेल्या अहवालात ते स्पष्ट होते. मलप्रभा नदीवरील धरणाचे पाणी कमी पडत असल्याने हा प्रयोग सुरू आहे. गोव्यात येणाऱ्या पाण्यापैकी केवळ 7.56 टिएमसी पाणी गेल्यास गोव्याला काहीच फरक पडणार नाही, असा अज्ञानपणाचा मुद्दा मांडणाऱ्या नेत्यांना आपण पटवून दिले आहे. कर्नाटकाचे मनसुबे वेगळेच आहे. त्याचा उत्तर गोव्यालाच नव्हे तर दक्षिण गोव्यालाही बराच फटका बसणार आहे.
वीस हजार वर्षांपूर्वी मांडवी, झुआरी एकत्र
20 हजार वर्षांपूर्वी मांडवी व जुवारी या दोन्ही नद्या एकत्र होत्या. त्या नद्यांचे दोन भाग झाले. मांडवी व झुआरी. कुंभारजुवेचा कालवा पाहिल्यास या दोन्ही नद्या एकत्रित असल्याचे लक्षात येते. जुवारी नदी ही खुप खारट आहे, तर मांडवी नदीतून येणारे गोडे पाणी तो खारटपणा कमी करण्याचे काम करते. जर हा खारटपणा वाढत गेला तर काय परिणाम होऊ शकतो, याची कल्पना करता येत नाही, असे यावेळी प्रा. राजेंद्र केरकर यांनी म्हटले.
… अन् म्हणे एक थेंबही देणार नाही
म्हादईचे पाणी वळविण्यास कर्नाटकने प्रारंभ केला आहे आणि आम्ही एक थेंबही नेऊ देणार नाही या वल्गना मारल्या जात आहेत. त्याला काहीच अर्थ नसून धारवाडसाठी 150 कि. मी. दूर पाणी वळविण्याचा कर्नाटक सरकारचा इतिहासातील पहिलाच प्रकार आहे. याबाबत गोवा सरकारकडून ज्या पध्दतीने प्रतिकार व्हायला हवा होता तो यापूर्वी झाला नाही. म्हादई अभयारण्य हे व्याघ्र क्षेत्र म्हणून जाहीर करण्यासाठी प्रयत्न अपुरेच पडत आहेत. व्याघ्र क्षेत्र झाले असते तर या प्रकल्पांना थाराच मिळाला नसता. आज लोक एकत्रित आले आहेत. ही एकी अशीच ठेऊन लढण्याची गरज आहे, असेही प्रा. केरकर म्हणाले.
या विषयावर राजकारणाला थारा नको
ज्याप्रमाणे कर्नाटकाचे सर्व पक्षातील नेते एकत्रित येतात तसेच गोव्यात सर्वांनी एका व्यासपीठावर येणे आवश्यक आहे. आमदारांनी यावर राजकारण करू नये. राजकारण करायचे असल्यास याविषयावर सखोल अभ्यास करून आमचा विजय कसा होईल यावर लक्ष द्यावे. राज्यातील नद्यांची परिस्थिती बिकट झालेली आहे. भारतातील 213 प्रदूषित नद्यांमध्ये गोव्यातील आठ नद्या प्रदूषित झालेल्या दिसून येते. म्हादईबरोबर गोव्यातील इतरही नद्यांचे अस्तित्व वाचविण्यासाठी ही चळवळ उभी करावी लागणार आहे. गोव्यात कोणत्याही प्रकल्पाच्या विरोधात खडबडून जागे होतात. परंतु अशा विषयावर लवकर जाग का येत नाही ? आमची जंगले आणि नद्या राहिल्यास आमचे अस्तित्व राहणार आहे. त्यासाठी कायदेशीर लढाई देणे गरजेचे ठरणार असून प्रभावी करावी लागणार. ही ज्योत आज पेटवली आहे. तिची मशाल करूया म्हणजे त्याचे मोठे होमखंड होणार आणि या विषयाचा प्रभाव केंद्रापर्यंत जाणार आहे, असेही प्रा. केरकर म्हणाले.
डिपीआर रद्द होत नसल्यास गोवा बंद करा सामूहिक राजीनामेही देऊया : सरदेसाई
साखळीत सभा होऊ नये यासाठी सरकार व मुख्यमंत्र्यांनी बरीच कसरत केली, परंतु आज सभा साखळीतच होत असून त्यातही फूट पडावी यासाठी एक भाड्याचा बैल मुख्यमंत्र्यांनी पकडला होता. राज्याच्या इतिहासात प्रथमच एक मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार टपाल मतांवर जिंकुन आलेला आहे. तोही त्या सरकारी कर्मचाऱ्यांवर दबाव टाकून. अशा मुख्यमंत्र्यांकडून काहीच अपेक्षा आम्ही ठेऊ शकत नाही.
मुख्यमंत्र्यांकडून काँग्रेसवर खापर
मुख्यमंत्र्यांचे सर्व प्रयत्न फोल ठरल्यानंतर त्यांनी ‘मन की बात’ केली. त्यात विरोधकांवर आरोप करताना 2007 ते 2012 च्या काँग्रेस सरकारला दोष दिला. पण आज दुर्दैवाने त्या सरकारातील सर्वजण याच सरकारात आहे. आजच्या विधानसभा अधिवेशनात राज्यपालांनी म्हादईवर सर्वप्रथम बोलावे अशी आमची मागणी होती, परंतु त्या विषयावर राज्यपालांनी एक शब्दही काढला नाही. आता मुख्यमंत्र्यांनी जर म्हादईला खरीच आपली माता मानत असल्यास केंद्र सरकारकडे येत्या 15 दिवसांत डिपीआर रद्द करण्याची जोरदार मागणी करावी. आणि ती मान्य न झाल्यास सर्वजण मिळून गोवा बंद करूया, त्याचाही काही परिणाम न झाल्यास मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, तरीही काहीच न झाल्यास सर्व चाळीसही आमदारांनी राजीनामा देऊन एक इतिहास निर्माण करूया, असे सरदेसाई म्हणाले.
केंद्राकडून लाचारीचे राजकारण : वेलिंगकर
प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी राज्यात व देशात सध्या लाचारीचे राजकारण फोफावत चालले आहे. राजकारण्यांना लाचार करून आपणास हवे ते करून घेण्याची वृत्ती केंद्रीय नेत्यांकडून वाढत चालली आहे. त्याचाच जास्त फटका राज्याला आज बसला आहे, असा आरोप केला.
म्हादईविना गोव्याचे काय होणार : कीर्ती आझाद
या सभेला खास उपस्थित भारतीय माजी क्रिकेटर कीर्ती आझाद यांनी, जल जिवन असून म्हादई ही माता आहे. ती अडविल्यास गोव्यातील पर्यावरणाचे काय होणार ? येथील पर्यटनाचे काय होणार ? याचा विचार सर्वप्रथम करायला पाहिजे. हे आंदोलन हे सर्वांचे आंदोलन आहे. त्यात कौटुंबिक पध्दतीने सर्वांनी सहभागी व्हावे. तसे न झाल्यास राज्याच्या विषयांमध्ये सत्तेला कोणतेच महत्त्व नाही, असे म्हटले.
राज्य सरकारचे 33 आमदार कर्नाटकच्या बाजूने
ह्रदयनाथ शिरोडकर यांनी यावेळी, आमची म्हादय आमका जाय असे म्हटल्यास म्हादई परत येणार नाही. त्यासाठी रस्त्यावर उतरावे लागणार आहे, कणकुंबीला जावे लागणार आहे. हे आंदोलन करून केंद्रातील नेत्यांना गोव्याची ताकद दाखवावी लागणार आहे. अनेक सरकारे राज्य आणि केंद्रात आली पण विश्वासघात करणारे सरकार आज राज्य व केंद्रात बसले आहे. राज्य सरकारचे 33 आमदार या आंदोलनात नसल्याने ते कर्नाटकच्या बाजूने असल्याचा आभास होत आहे.
हा लढला आपला असल्याचा विश्वास बळगा
दामोदर मावजो यांनी म्हटले की, हा लढा आमचा असून कोणावरही विसंबून राहायचे नाही. दुसऱ्यावर राहिल्यास आम्ही जिंकू शकणार नाही. त्यासाठी सर्वप्रथम आपल्या लढ्यावर व स्वत:वर विश्वास ठेवावा. असाच विश्वास गोव्याचे अस्तित्व राखण्यासाठी घेतलेल्या ओपिनियन पोलच्या वेळी ठेवला होता. त्यामुळे गोवेकरांनी तो लढा जिंकला होता. हा लढा आज आम्हाला जिंकायचा आहे. म्हणून सर्वांनी स्वत:मधील ज्योतीची मशाल करावी लागणार आहे, असे आवाहन केले.
वेलेन्सियो रॉड्रीगिस यांनी गोव्याला नेस्तनाबूत करण्यासाठी केंद्र सरकारने चंगच बांधला असून म्हणूनच गोव्यात पर्यावरणाची हानी करणारे मोठमोठे प्रकल्प आणले आहेत. म्हादईचा डिपीआर मंजूर करून केंद्राने कर्नाटकाला भेट दिली आहे, असे सांगितले.
तारा केरकर यांनी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गोवेकर आंदोलन करणार नाहीत असे म्हटले होते. आज त्यांनी गोवेकरांची ताकद पहायला येणे आवश्यक होते. गोव्यात पाच चांगले प्रकल्प आणणार असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जुवारी पुलाच्या उदघाटनाच्या वेळी सांगितले होते. परंतु या प्रकल्पांना पाणी कुठून देणार, याचे उत्तर द्यावे, असे सांगितले.
फादर बॉलमेक्स म्हणाले की जर हे सरकार आणि मुख्यमंत्री म्हादई वाचविण्यात अमसर्थ ठरत असल्यास त्यांनी राजिनामा द्यावा.
कन्नड धनगर समाजाचे प्रतिनिधी शरण मेटी यांनी या विषयी आम्ही गोव्याला पाठिंबा आहे. कर्नाटकचे सुमारे 3 लाख लोक राहतात. ते सर्व व गोवेकर मिळून आम्ही एकत्रित लढा देऊ. म्हादईसाठी आम्हीही रस्त्यावर उतरणार आहोत. लवकरच आम्ही कर्नाटकचे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असून त्यांना म्हादईवरील अत्याचार थांबविण्याची मागणी करणार आहे, असे सांगितले.
साहित्यिक दत्ता नाईक म्हणाले की भारतातून पाकिस्तानमध्ये सहा नद्या वाहतात. ते पाणी भारत अडवू शकत नसल्यास कर्नाटक गोव्याचे पाणी कसे अडवू शकते. अनेक बलाढ्या देश दुस्रया देशात जाणाऱ्या नद्या अडवू शकत नाही. तर भारत देशातील एक राज्य दुसऱ्या राज्याचे पाणी कसे अडवू शकते? या सरकारला पुल बांधायला खुप आवडते, भविष्यात पुल खुप असणार पण त्याखालून वाहणारे पाणी नसणार, हे लक्षात घ्यावे.
नगराध्यक्ष राजेश सावळ यांनी स्वागत करताना या विषयावर आज राजकारण झाले. यावर राजकारण होणे दुर्दैवी आहे. साखळी नगरपालिका मैदानावरील बैठकीची मंजूरी मागे घेण्यात आली. त्यावेळी आपण हि सभा साखळीतच आणि आपल्या जागेत घेणार असे ठरविले. आणि आज सभा विर्डीतच होत आहे. ही अभिमानास्पद बाब आहे. असे म्हटले. प्रा. प्रजल साखरदांडे यांनी सविस्तर माहिती दिली. शंकर पोळजी यांनी म्हादई हा धर्म आहे. त्याचे शिक्षण देणे आवश्यक आहे. कारण पाणी नसल्यास कोणी वाचणार नाही. पक्ष वाढविण्यासाठी वावरतात तसेच म्हादईसाठी काम करा, असे आवाहन केले.
इफ्तीकार शेख म्हणाले, गोवेकर म्हादईसाठी गंभीर असून आमची जिवनदायिनी आम्ही वळवू देणार नाही. हे येथे जमलेल्या सर्वांनी सिध्द केले आहे. गावडा कुणबी समाजाचे प्रवत्ते गोविंद शिरोडकर यांनी सांगितले की आंतरराज्य नदीचा प्रवाह अडवू शकत नाही. हे वैश्विक सत्य असून ते बदलू शकत नाही. सुनिता वेरेकर म्हणाल्या की, म्हादईबाबत आज साखळी व सत्तरीत जागृती करावी लागणार आहे. कारण या भागातील लोक बरेच दडपणाखाली आहेत. या विषयावर आज सरकारचे नाक दाबण्याची वेळ आलेली आहे. तनोज अडवलपालकर, रामा काणकोणकर, प्रशांत नाईक यांची भाषणे झाली. आभार महेश म्हंबरे यांनी मानले. सूत्रसंचालन अनंत अग्नी यांनी केले.