सर्वोच्च न्यायालयाकडूनही ‘हिरवा कंदील’
बेंगळूर : पाचवी आणि आठवीसाठी बोर्ड परीक्षा घेण्याबाबत कर्नाटक उच्च न्यायालयाच्या द्विसदस्यीय खंडपीठाने दिलेला निर्णय सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला आहे. तसेच कर्नाटक शिक्षण खात्याला परीक्षा घेण्यास हिरवा कंदील दाखविण्यात आला असून विनाअनुदानित शाळा व्यवस्थापन संघटनांनी दाखल केलेली याचिका फेटाळून लावली आहे. त्यामुळे सोमवार दि. 27 मार्चपासून सुरू झालेल्या पाचवी व आठवीच्या बोर्डाच्या परीक्षेतील अडसर दूर झाला आहे. राज्य सरकारने विद्यार्थ्यांमधील अध्ययन पातळीचे मूल्यमापन करण्यासाठी 2022-23 या वर्षात पाचवी आणि आठवीसाठी बोर्डाची परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाविरोधात विनाअनुदानित शाळा व्यवस्थापन संघटनांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयाच्या एकसदस्यीय खंडपीठाने बोर्डाची परीक्षा न घेण्याचा आदेश दिला होता. या आदेशाविरोधात राज्य सरकारने 16 मार्च रोजी अपील केले होते. या याचिकेवर द्विसदस्यीय खंडपीठासमोर सुनावणी झाली. या खंडपीठाने बोर्डाची परीक्षा घेण्यास सक्तीच्या शिक्षण कायद्यांतर्गत कोणतेही बंधन नाही, असा आदेश देत एकसदस्यीय खंडपीठाच्या आदेशाला स्थगिती दिली. तसेच 27 मार्चपासून परीक्षा घेण्याचे निर्देश सरकारला दिले होते. त्यामुळे विनाअनुदानित शाळा व्यवस्थापन संघटनांनी परीक्षेविरोधात सर्वोच्च न्यायालयात आव्हान देत याचिकेवर तातडीने सुनावणी करण्याची विनंती केली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने 27 मार्च रोजी सुनावणी करणार असल्याचे सांगितले होते. सोमवारी सकाळी सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड, न्या. पी. एस. नरसिंह आणि न्या. जे. बी. पर्डीवाला यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.
पाचवीची 30 मार्चपर्यंत, आठवीची परीक्षा 1 एप्रिलपर्यंत
पाचवीची परीक्षा 30 मार्चपर्यंत तर आठवीची परीक्षा 1 एप्रिलपर्यंत होणार आहे. 30 मार्च रोजी गणित विषयाचा पेपर सकाळी 10:30 ते 12:30 पर्यंत होईल. तर उर्वरित सर्व पेपर दुपारी 2:30 ते 4:30 या वेळेत होणार आहेत.
शिक्षण खात्याच्या सूचनेनुसार परीक्षांना सुरुवात
शिक्षण खात्याच्या सूचनेनुसार पाचवी व आठवी इयत्तांच्या बोर्ड परीक्षेला सोमवारपासून प्रारंभ झाला. दुपारी 2.30 ते 4.30 यावेळेत प्रथम भाषा विषयाचा पेपर झाला. पहिल्यांदाच बोर्ड परीक्षेला सामोरे जाणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता होती. सुरळीत पद्धतीने बोर्ड परीक्षेला सुरुवात झाली आहे. दहावी व बारावीच्या धर्तीवर पाचवी व आठवी इयत्तांच्या बोर्ड परीक्षा घेण्याचा निर्णय शिक्षणमंत्री बी. सी. नागेश यांनी घेतला होता. परंतु मध्यंतरीच्या काळात हा प्रश्न न्यायालयात पोहोचल्याने बोर्ड परीक्षा होणार की नाही, याबाबत साशंकता होती. न्यायालयाने परीक्षा घेण्यास सहमती दर्शविल्याने शिक्षण खात्याच्या सहयोगाने सोमवार दि. 27 पासून बोर्ड परीक्षेला सुरुवात झाली.
प्रत्येक क्लस्टरमध्ये स्ट्राँग रूम
दहावीप्रमाणे ही परीक्षा घेतली जाणार असल्याने तशाच पद्धतीचे नियोजन करण्यात आले आहे. प्रत्येक क्लस्टरवर स्ट्राँग रूम तयार करण्यात आले आहेत. पेपर सुरू होण्यापूर्वी 1 तास शाळेच्या केंद्र प्रमुखांच्या हातात प्रश्नपत्रिका देण्यात आल्या. दुपारी 2.30 ते 4.30 यावेळेत प्रथम भाषा विषयाचा पेपर झाला. मराठी, इंग्रजी, उर्दू, कन्नड या सर्वच माध्यमांच्या शाळांमध्ये एकाचवेळी परीक्षा घेण्यात आल्या. विद्यार्थ्यांना सोडण्यासाठी पालकांची शाळांबाहेर गर्दी झाली होती.