सुदैवाने पायलटसह 5 जवान सुरक्षित
जयपूर / वृत्तसंस्था
भारतीय हवाई दलाच्या हेलिकॉप्टरचे मंगळवारी राजस्थानमधील हनुमानगड येथे एका शेतात इमर्जन्सी लँडिंग करावे लागले. एमआय-35 हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानंतर आपत्कालीन स्थितीत हा निर्णय घेण्यात आला. याप्रसंगी हेलिकॉप्टरमध्ये पायलटसह पाच जवान होते. हे सर्वजण सुरक्षित असल्याची माहिती हवाई दलाकडून देण्यात आली. मात्र हेलिकॉप्टरमध्ये नेमका काय बिघाड झाला होता हे स्पष्ट करण्यात आलेले नाही. या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे निर्देश हवाई दलाकडून देण्यात आले आहेत.
हेलिकॉप्टर शेतात उतरल्यानंतर अचानक आजूबाजूचे लोक जमा झाले. हवाई दलाचे हेलिकॉप्टर शेतात कोसळल्याची अफवा पसरल्याने ग्रामस्थांनी शेताकडे धाव घेतली. घटनास्थळी भेट दिली असता हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग झाल्याचे दिसून आले. माहिती मिळताच हनुमानगड जिह्यातील सदर, संगरिया आणि सादुलशहर पोलीस ठाण्यांव्यतिरिक्त गावातील लोकप्रतिनिधी घटनास्थळी पोहोचले.
हेलिकॉप्टरने मंगळवारी सकाळी सुरतगडच्या एअर फोर्स स्टेशनवरून उड्डाण केले. हेलिकॉप्टरमध्ये पायलटसह पाच जवान होते. हनुमानगड परिसरात पोहोचल्यावर अचानक हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाला. यावर पायलटने सकाळी 9.30 च्या सुमारास ढोलीपाल आणि किकरवली या गावांच्या दरम्यान असलेल्या चक 9 एमएमके (गावाचे नाव) येथे शेतात इमर्जन्सी लँडिंग केले. लँडिंग केल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या जवानांनी वरि÷ अधिकाऱयांना माहिती दिली आणि हेलिकॉप्टरमधील बिघाड दूर करण्याचा प्रयत्न केला. यावेळी गावकऱयांची मोठी गर्दी घटनास्थळी जमा झाली होती. घटनेनंतर पोलीस अधिकाऱयांनी पायलट आणि जवानांकडून माहिती घेतली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरतगडमधील हवाई दलाचे अभियंते घटनास्थळी पोहोचले असून हेलिकॉप्टरमधील तांत्रिक बिघाड दूर करण्याचे प्रयत्न सायंकाळपर्यंत सुरू होते. हवाई दलाने हेलिकॉप्टरच्या सुरक्षेची जबाबदारी घेतली असली तरी काही पोलीस कर्मचारीही तेथे तैनात करण्यात आले होते.