प्रतिनिधी /बेळगाव
अनगोळ नाका ते धर्मवीर संभाजी चौकपर्यंतच्या रस्त्याचा विकास स्मार्टसिटीच्या माध्यमातून करण्यात आला. मात्र आता या रस्त्यावरील पथदीप बंद असल्यामुळे अंधाराचे साम्राज्य सर्वत्र पसरले आहे. त्यामुळे शोभेचे खांब आणि त्यावरील विद्युत रोषणाई कुचकामी ठरली आहे. यामुळे नागरिकांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
या मुख्य रस्त्याच्या शेजारी अनेक दुकाने आहेत, मंदिरे आहेत, मंगलकार्यालये आहेत. त्यामुळे या रस्त्याचे रुंदीकरण तसेच काँक्रिटीकरण करण्यात आले. पादचाऱ्यांसाठी फुटपाथ तयार करण्यात आले. तर या रस्त्याचे सुशोभिकरण करण्यासाठी शोभेचे खांब लावून त्यावर रोषणाई करण्यात आली. मात्र या खांबावरील दिवेच बंद अवस्थेत आहेत. तर काही खांबावरील दिवे गायब झाले आहेत. त्यामुळे रात्रीच्यावेळी ये-जा करणे अवघड झाले आहे.
या मुख्य रस्त्यावरून नेहमीच वर्दळ असते. त्यामुळे पादचाऱ्यांना पदपथावरून ये-जा करावी लागते. मात्र अंधार असल्यामुळे आणि पदपथावर काही ठिकाणी अडथळा असल्यामुळे त्याचा मोठा त्रास होत आहे. या रस्त्यावर असलेल्या मंदिरात ज्येष्ठ भाविक ये-जा करत असतात. भाजीविक्रेते तसेच किराणा दुकाने या रस्त्यावर आहेत. त्यामुळे खरेदीसाठी नागरिक मोठी गर्दी करत असतात. त्यांना या अंधाराचा सामना करावा लागत आहे. तेंव्हा तातडीने या रस्त्यावरील दिवे सुरू करावेत, अशी मागणी होत आहे. या रस्त्यावरील 20 हून अधिक दिवे बंद आहेत. सध्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर या खांबांवरील वीजपुरवठा सुरू करण्यात आला आहे. मात्र अनेक खांब बंद अवस्थेत असल्याचे दिसून येत आहे.