अहिल्या परकाळे,कोल्हापूर
Raksha Bandhan Special News : राखी पौर्णिमेनिमित्त अनेक संस्था, संघटना सीमेवर लढणाऱ्या सैनिकांना राख्या पाठवत असतात.हा उपक्रम स्तुत्यच आहे.परंतू कायदा, सुव्यवस्था अबाधित राखणाऱ्या पोलीसांना राखी पाठवण्याची सामाजिक बांधिलकी आजतागायत कोणी जपली नाही.त्यामुळे नागरीकांच्या संरक्षणासाठी राबणाऱ्या कोल्हापूरातील पोलीस बांधवांना पाचशेहून अधिक पर्यावरण संवर्धक राख्या राजाराम कॉलेजमधील वनस्पतीशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांनी पाठवल्या आहेत.विशेष बाब म्हणजे ‘सीड’ (विविध प्रकारचे बि-बियाणे) राख्यांमधून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत, केलेल्या या अभिनव सामाजिक उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
पर्यावरण संवर्धनासाठी राज्य, केंद्र सरकार, शैक्षणिक, सामाजिक संघटना अनेक उपक्रम राबवत असतात.आता प्रत्येक भारतीय सणांच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा उद्देश यशस्वी होताना दिसतोय.रक्षाबंधन झाल्यानंतर प्लॅस्टिकच्या राख्यांमुळे प्रदुषण वाढते.परंतू धान्य व मसाल्यापासून बनवलेल्या राख्यांचे कागद व धागे कुजतात, तर बिया अंकुरीत होतात. म्हणूनच राजाराम महाविद्यालयाने धान्यापासून बनवलेल्या ‘सीड’ राख्या पर्यावरणप्रेमींसह सर्वच जनतेच्या पसंदीस पडल्या आहेत.मातीपासून गणपती तयार करून त्यामध्ये धान्यांचे बीज अंकुरीत करण्याचा पहिला प्रयोग शिवाजी विद्यापीठातील पर्यावरणशास्त्र विभागाने केला. दरवर्षी कार्यशाळा घेत मातीपासून वेगवेगळ्या आकाराचे सीड गणपती तयार केले जातात. या गणपतींचे कुंडीत किंवा शेतात विसर्जन केले जाते.आता एक पाऊल पुढे टाकत ‘सीड राख्या’ तयार करून पर्यावरण संवर्धन केले जात आहे.दररोजच्या वापरातील धने, जीरे, मीर, लवंग, महुरी, पोहे, तुरडाळ, अख्खा मसूर, हिरवे मूग, मटकी, तांदूळ गहू, ज्वारी, आदींचा वापर करून राजाराम कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या राख्या तयार केल्या आहेत. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या सीड राख्यांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. या प्रदर्शनात राख्यांची मोठया प्रमाणात विक्रीदेखील झाली आहे. या सीड राख्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
नवीन शैक्षणिक धोरणानुसार कौशल्याधिष्ठीत प्रशिक्षण देण्यासाठी बांबूपासून राख्या,गणपती, कागद आणि सीड राख्या तयार करण्याचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना दिले आहे. त्यांनी तयार केलेल्या राख्यांची विक्री व्हावी म्हणून प्रदर्शन भरवण्यात आले होते.जवळपास एक हजार राख्यांची विक्री झाली.तर विद्यार्थ्यांनी आपल्या घरात सीड राख्या वापरण्याचा निश्चिय केला आहे.त्यामुळे सीड राख्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी मिळाली आहे.मसाले,भाजीपाल्यांच्या बिया,कडधान्य आणि यंदा भरड धान्य वर्ष असल्याने नाचणी, राळे, बाजरी, वरी, ज्वारीपासून राख्या तयार करून भरड धान्य वर्षाचा संदेश दिला आहे.भरड धान्यांचा आहारात किती उपयुक्तता आहे हेदेखील विद्यार्थ्यांनी ग्राहकांना पटवून दिले.
सीड राख्या मातीत अंकुरीत होतात
राखी पौर्णिमा झाल्यानंतर राख्या टाकूनच दिल्या जातात.सीड राख्या टाकूण दिल्या तर त्यापासून प्रदुषणात वाढ होणार नाही.तर या राख्यांना लावलेले कागद आणि दोरे मातीत कुजतात. तर बिया अंकुरीत होतात किंवा कुजतात.त्यामुळे सीड राख्यांमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत नाही.
या उपक्रमाचा नॅक मूल्यांकनात समावेश
कौशल्याधिष्ठीत प्रशिक्षण देवून रोजगाराची संधी निर्माण करून दिली पाहिजे हा नवीन शैक्षणिक धोरणाचा मुख्य उद्देश आहे.तसेच सीड राख्या, सीड गणपती आणि हर्बल प्रोडाक्ट प्रशिक्षण उपक्रमाचा नॅक मूल्यांकनात अतिशय उपयोग होतो.या उपक्रमामुळे गुणांकनाचा टक्काही वाढण्यास मदत होते.
सीड राख्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या उद्योजकतेला प्रोत्साहन
विद्यार्थ्यांनी स्वत:बनवलेल्या सीड राख्यांची विक्री झाली आहे.तसेच आपण तयार केलेली राखी आपण आपल्या भावाला बांधणार याचा वेगळाच आनंद असतो. जवळपास 300 विद्यार्थ्यांनी स्वत:सीड राख्या बनवल्या आहेत. पर्यावरणपूरक पेपर बॅग, क्लॉथ बॅग, सीड राख्या, सीड गणपती या छोट्या छोट्या गोष्टींमधून विद्यार्थ्यांच्या उद्योजकतेला प्रोत्साहन मिळते. या प्रशिक्षणाचे विद्यार्थ्यांनी व्यवसायात रूपांतर केले पाहिजे.
डॉ. अंजली पाटील (वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख, राजाराम कॉलेज)