सावंतवाडी प्रांत विभागाचा अजब नमुना ; उमेदवार चिंतेत ; सावंतवाडी केंद्रात २६४ उमेदवारांनी दिली परीक्षा
सावंतवाडी । प्रतिनिधी
तुम्ही दहावी उत्तीर्ण असलात तरी तुम्हाला महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग एमपीएससी व यूपीएससी परीक्षेचे ज्ञान असायलाच हवे. कारण, आता तुम्ही कुठलीही परीक्षा देण्यासाठी सज्ज व्हा. तुम्हाला एमपीएससी यूपीएससीच्या धर्तीवरच प्रश्नपत्रिका काढली जात आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या पोलीस पाटील पदासाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. आणि या प्रक्रियेसाठी 80 मार्कांची लेखी परीक्षा सध्या घेण्यात येत आहे. या परीक्षेत सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाचा अजब प्रकार बघायला मिळाला . पोलीस पाटील पदासाठी दहावी उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांना 80 मार्काची परीक्षा प्रश्नपत्रिका काढताना एमपीएससीच्या धर्तीवर प्रश्नपत्रिका काढून प्रशासनाने नेमकं साधलं तरी काय ? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडतोय . राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या मतदारसंघातील तिन्ही तालुक्यात रविवारी ७ जानेवारीला 264 पोलीस पाटील पदांसाठी १० वी उत्तीर्ण उमेदवार परीक्षेला बसले होते. प्रश्नपत्रिका 80 मार्कांची होती . प्रशपत्रिकेतले सर्व प्रश्न हे एमपीएससीच्या धर्तीवर आधारित होते . त्यात गाव स्तरावरील किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तसेच पोलीस पाटील पदाची कर्तव्य यावर आधारित एकही प्रश्न नव्हता. पोलीस पाटील पदासाठी अवघे साडेसहा हजार रुपये मानधन आणि ते सुद्धा गाव स्तरावर काम असे असताना परीक्षा मात्र एमपीएससीच्या धर्तीवर घेतली गेली आहे . त्यामुळे अजब तुझे हे सरकार अशी म्हणण्याची वेळ. या दहावी उत्तीर्ण पोलीस पाटील पदासाठी सज्ज असलेल्यांच्या समोर पडला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात ८ तालुके येतात. त्यातील कणकवली प्रांत विभागात गेल्याच महिन्यात पोलीस पाटील पदासाठी परीक्षा झाली. मात्र ,त्यावेळी प्रश्नपत्रिका काढताना पोलीस पाटील पदाला अपेक्षित असलेले प्रश्न विचारण्यात आले होते. मात्र ,त्याउलट राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या मतदारसंघातील सावंतवाडी, दोडामार्ग ,वेंगुर्ले, या तिन्ही तालुक्यातील प्रांत विभागात ७ जानेवारीला काढण्यात आलेली प्रश्नपत्रिका दहावी उत्तीर्ण पोलीस पाटील पदासाठी बसलेल्या उमेदवारांच्या डोक्यावरून जाणारी ठरली आहे . त्यामुळे नेमके प्रश्न काय ते मात्र या विद्यार्थ्यांना उमगले नाहीत . त्यामुळे पोलीस पाटील पदाची भरती की पोलीस निरीक्षकांची भरती हेच विद्यार्थ्यांना कळले नाही . जणू एमपीएससी साठी पोलीस निरीक्षक किंवा पोलीस हवालदार किंवा तहसीलदार, प्रांत होण्यासाठी जशी परीक्षा घेतली जाते आणि जशी प्रश्नपत्रिका असते त्या धर्तीवर ही प्रश्नपत्रिका होती. खरंतर पोलीस पाटील पद हे तात्पुरत्या स्वरूपातील व हंगामी तत्त्वावरील असून या पदाला अवघे साडेसहा हजार रुपये मानधन मिळते . त्यामुळे एमपीएससीच्या धर्तीवची प्रश्नपत्रिका असणे म्हणजे उमेदवारांना गोंधळात टाकणारी आहे . पोलीस पाटील पदाचे गाव मर्यादित कार्यक्षेत्र आहे . असे असताना हंगामी पदासाठीच्या या पोलीस पाटील पदासाठी जर किचकट प्रश्न आणि कठीण प्रश्न विचारून नेमकं प्रशासनाने आणि प्रांत विभागाने साधले तरी काय आणि त्यांना नेमकं यातून काय साध्य करायचे आहे हेच उमेदवारांना पडलेले कोडे आहे . खरंतर प्रशासनाच्या या कारभाराबाबत आणि एकंदरीत काढलेल्या प्रश्नपत्रिकेमुळे उमेदवार गोंधळात तर पडलेच आहेत. पण त्यापेक्षाही पोलीस पाटील पदाची ही भरती की भविष्यात प्रशासनाला या पोलीस पाटलांना पोलीस सेवेत घ्यायचे आहे का असा प्रश्न यातून पडत आहे. खरंतर आता दहावी उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांना या पोलीस पाटील पदासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया होती. मात्र त्यात काही बारावी पदवी असलेल्या उमेदवारांनी अर्ज केले. सध्या सुशिक्षित बेरोजगारांची संख्या वाढत चालली आहे . त्यात नोकऱ्याही नाहीत. शासकीय नोकऱ्यांची तर वानवा आहे . त्यामुळे आता मिळेल ती नोकरी मिळवणे ही उमेदवारांची भूमिका असते . पोलीस पाटील असो किंवा कोतवाल असो त्यासाठी आता सुशिक्षित बेरोजगार तरुण-तरुणी अर्ज भरत आहेत आणि त्यात प्रशासन अशी या मुलांची कुचेष्टा करताना दिसत आहे.खरतर या परीक्षेत पोलीस पाटील पदाची कर्तव्य विचारणारे तसेच कायदा सुव्यवस्था आणि गाव स्तरावरील किंवा जिल्हास्तरावरील प्रश्न विचारणे आवश्यक होते . मात्र एवढे कठीण प्रश्न पोलीस पाटील पदासाठी विचारण्यात आल्याने उमेदवार सध्या चिंतेत आहेत. एक तर महिन्याला साडेसहा हजार रुपये मिळणार. आणि पोलीस पाटील पदासाठी 80 मार्कची परीक्षा द्यायची तर आता यापुढे खाजगी कोचिंग क्लास लावावे लागतील की काय असा प्रश्नही आता उपस्थित केला जात आहे. सावंतवाडी ,दोडामार्ग ,वेंगुर्ले या तीन तालुक्यात काल घेण्यात आलेली पोलीस पाटील पदाची भरती 80 मार्काची परीक्षा प्रश्नपत्रिका जठिल करण्यात आल्याने पुनश्च परीक्षा घेण्यात यावी अशी मागणी आता उमेदवारांकडून करण्यात येत आहे. तसेच परीक्षा रद्द न केल्यास गुणांका मध्ये शिथिलता द्यावी अशी मागणी करण्यात येत आहे.