पावसाचा आरंभबिंदू मानल्या जाणाऱया मृग नक्षत्रास सुरुवात झाली असली, तरी अद्यापही नैत्य मोसमी वारे दृष्टीपथात नसल्याने शेतकऱयांसह सर्वच घटकांमध्ये चिंता निर्माण होणे स्वाभाविकच म्हणावे लागेल. मृग नक्षत्र आणि पाऊस हे एक पारंपरिक समीकरण मानले जाते. सूर्याचा मृग नक्षत्रात प्रवेश झाला, की पावसाळय़ास प्रारंभ झाला, असा भारतीय संस्कृतीत पूर्वापार समज आहे. किंबहुना, यंदाचा मान्सूनचा प्रवास पाहता पावसाचे आगमन लांबणार का नि पर्यायाने मृग नक्षत्रातील काही दिवस कोरडे जाणार का, हे प्रश्न आता अधिक गडद झाल्याचे पहायला मिळते. यंदा 16 मे रोजी मोसमी पाऊस अंदमान निकोबार बेटावर दाखल झाला. त्यानंतर केरळातही त्याने 29 मेच्या सुमारास धडक मारली. नियोजित वेळेआधीच मान्सूनची वाटचाल सुरू झाल्याने शेतकऱयांच्या आशा पल्लवित झाल्या खऱया. परंतु, त्यानंतर मात्र त्याने हुलकावणी दिल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. कर्नाटक किनारपट्टी, दक्षिण अंतर्गत कर्नाटक, तामिळनाडूत प्रवेशलेल्या या पावसाने कारवार, चिक्कमंगळूर, बेंगळूर, धर्मापुरीपर्यंतच्या भागापर्यंत मजल मारली असली, तरी त्यापुढे त्याची गाडी सरकू शकलेली नाही. एकीकडे मान्सूनच्या पूर्व शाखेने पूर्वोत्तर भारतासह सिक्कीम, पश्चिम बंगालचा बहुतांश भाग व्यापत आपली सक्रियता दाखवून दिली असताना पश्चिम शाखा काहीशी कमजोर पडल्याचे दिसून येते. अनुकूल स्थितीअभावी गेले आठवडाभर कर्नाटकाच्या काही भागापर्यंतच ही शाखा येऊन खोळंबल्याचे पहायला मिळते. त्यामुळे कर्नाटकचा उर्वरित भाग, कोकण-गोव्यासह महाराष्ट्रात अद्यापही मोसमी पावसाच्या सरींची बरसात होऊ शकलेली नाही. हवामान विभागाने मान्सूनचे वेळापत्रक तयार केले आहे. यातील तारखांनुसार पाऊस त्या-त्या ठिकाणी येणे अपेक्षित असते. अंदमान 22 मे, केरळ 1 जून, तर तळकोकणात 7 जूनपर्यंत मान्सून दाखल होणार, असे मानले जाते. त्यापुढे 15 जूनपर्यंत मान्सून महाराष्ट्र, तर महिनाभरात म्हणजे 15 जुलैपर्यंत संबंध देश व्यापतो. अर्थात या प्रवासात अडथळे आले, तर नक्कीच पाऊस लांबण्याची शक्यता गृहीत धरावी लागते. कोकण-गोवा वा महाराष्ट्राबाबत बोलायचे झाल्यास 7 जूनचा मुहूर्त नक्कीच टळला आहे, असे म्हणता येईल. आता 12 जूनच्या आसपास तो येईल, असे सांगितले जात आहे. म्हणजे आणखी पाच ते सात दिवस गृहीत धरले, तरी आठवडाभर पाऊस लांबू शकतो. हवामान विभागाने आगमन लांबले नसून, आपण अद्यापही नियमित वेळेच्या जवळ असल्याचे सांगितले असेलही. तरी मृगातील मोठा कालावधी वाया गेला, तर त्याचा शेतीवर प्रतिकूल परिणाम तर होणार नाही ना, अशी भीती आहे. आजही भारतातील बव्हंशी शेतकरी पारंपरिक पद्धतीने शेती करतात. मृग नक्षत्रातील कालावधी हा तर शेती वा पिकाच्या दृष्टीने सर्वाधिक अनुकूल मानला जातो. त्यामुळे याचदरम्यान शेती वा शेतीपूरक कामे उरकण्याकडे शेतकऱयांचा कल असतो. अर्थात पावसानेच ओढ दिली, तर पुढे काय, हाच आजचा कळीचा मुद्दा आहे. त्यामुळे पुढचे काही दिवस शेतकऱयांसाठी निश्चितपणे धाकधुकीचे असतील. आजही देशातील 65 टक्के नागरिक प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरीत्या शेतीवर अवलंबून आहेत. परंतु, शेतीइतका दुसरा अस्थिर व्यवसाय जगाच्या पाठीवर नसावा. निसर्गाच्या लहरीपणाचे फटके शेती व शेतकरी कायमच सोसत आला आहे. तथापि, मागच्या काही वर्षांत याची वारंवारिता वाढल्याचे ध्यानात येते. अतिवृष्टी, ढगफुटी, गारपीट, अवर्षण अशा वेगवेगळय़ा चक्रात कृषीव्यवस्था भरडून निघत आहे. हे पाहता यंदा पावसाचे गणित बिघडले, तर शेतकऱयांसाठी ती पुन्हा कसोटी ठरू शकते. खरे पाहता हवामान विभागाचा या वर्षीचा अंदाज तसा सुखावह म्हणता येईल. आयएमडीने प्रारंभी देशात सरासरीच्या 99 टक्के इतका पाऊस होण्याचा अंदाज वर्तविला होता. त्यानंतर दीर्घकालीन अंदाज 4 टक्क्याने वाढवत देशभरात सरासरीच्या 103 टक्के पावसाचे भाकीत वर्तविण्यात आले. हवामान विभागाचा सुरुवातीपासून चुकलेला अंदाज बघता वरुणराजाची अशी काठोकाठ मेहेरनजर राहणार का, याविषयी निश्चितपणे साशंकता निर्माण होऊ शकते. वास्तविक पाहता अलीकडच्या काही वर्षांत हवामान विभागाच्या मान्सूनविषयक अंदाजप्रणालीत बऱयापैकी सुधारणा झाल्या असून, त्यांचे अनेक अंदाज वस्तुनिष्ठ ठरल्याचे दिसते. यात काही वेळा गफलती झाल्या असल्या, तरी या वर्षीप्रमाणे शक्याशक्यतांचे गलबत इतके भरकटल्याचे दिसले नाही. त्यामुळे आगामी काळात अधिक काळजीपूर्वक काम कसे करता येईल, यावर कटाक्ष असावा. निसर्ग हा लहरी असतो. त्याला कवेत घेण्याचा कितीही प्रयत्न केला, तरी एका मर्यादेपलीकडे आपण निसर्गापुढे जाऊ शकत नाही. हे सत्य आहे. त्यामुळे काही ठोकताळे चुकणार, यात संदेह नाही. मात्र, अत्याधुनिक साधनांचा वापर, सखोल संशोधकांची फळी याआधारे अधिक अचूक अंदाज कसा नोंदविता येईल, यासाठी प्रयत्न हवेत. मागच्या काही वर्षांत काही खासगी हवामान संस्था तसेच व्यक्तीही अंदाज वर्तविताना दिसतात. त्यांचे काही अंदाजही बरोबर असू शकतात. पण म्हणून त्यांनी हवामानशास्त्रात मास्टरकी मिळविली, असे समजणे भाबडेपणाचे ठरेल. मुळात अशा व्यक्ती वा संस्थांकडे हवामान विभागासारखे नेटवर्क वा यंत्रणा नाही. हवामान विभागाचा डाटा अभ्यासूनच ते बव्हंशी विश्लेषण करीत असतात. त्यामुळे त्यांच्या अहवालाची नोंद जरूर घेतली जावी. परंतु, तो प्रमाणभूत मानणे वा त्यास अग्रक्रम देणे, हे चुकीचे ठरू शकते. भारतीय हवामान विभागास एक दीर्घ परंपरा आहे. शेकडो शास्त्रज्ञांच्या अथक परिश्रमातून व संशोधनातून या संस्थेने हवामान क्षेत्रात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. त्यामुळे अंदाज चुकला म्हणून त्यांना एकदम आरोपीच्या पिंजऱयात उभे करून खासगी संस्थांचा उदोउदो करणे, हेही व्यावहारिकपणाचे लक्षण मानता येत नाही. ती काळजी माध्यमांनी-अन्यांनी प्रत्येकानेच घ्यायला हवी. पावसाला ‘आनंदघन’ असेही संबोधले जाते. लांबला, विलंबाने आला, तरी येताना तो आनंद वा चैतन्य घेऊनच येत असतो. अशा आनंदधारा घेऊन त्याने सर्वदूर बरसावे, हीच इच्छा.
Previous Articleआनंदची रॅझबोव्हवर मात
Next Article रेपो दरात वाढ, कर्जे महागणार
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.