पोलीस प्रशासनाकडून आंदोलन थांबवून बुधवारी बैठक घेण्याचे आश्वासन : कार्यालयासमोरच केला स्वयंपाक
बेळगाव : नगरविकास प्राधिकरणाने विविध प्रकल्प आणि वसाहती निर्माण करण्यासाठी कणबर्गी परिसरातील सुपीक जमीन संपादित केली आहे. दरम्यान उर्वरित जमीनदेखील काबीज करून शेतकऱ्याला भूमीहीन करण्याचा प्रयत्न सुरू आहे. हा प्रयत्न बुडाने थांबवावा, यासाठी सिद्धेश्वर शेतकरी संघटनेने शुक्रवारी बुडा कार्यालयाला टाळे ठोकून आंदोलन छेडले. शिवाय कार्यालयासमोर स्वयंपाक करून धरणे आंदोलन केले. दरम्यान पोलीस प्रशासनाने आंदोलन थांबवून बुधवारी याबाबत बैठक घेण्याचे आश्वासन दिले.
नगरविकास प्राधिकारणाने 160 एकर जमिनीपैकी शेतकऱ्यांना आणि बुडा कार्यालयाला प्रत्येकी 50 टक्के देण्याचे निर्देश दिले होते. हे मान्य नसल्याने शेतकऱ्यांनी न्यायालयात धाव घेतली आहे. दरम्यान न्यायालयातून नोटीस बजाविण्यात आली आहे. 160 एकर जमिनीपैकी 65 एकर जमीन भूमाफियाने बेकायदेशीर लाटली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना फटका बसला आहे. सातत्याने बुडाकडून जमिनींवर कब्जा मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. शिवाय शेतकऱ्यांवर दबावतंत्राचा प्रयत्न केला जात आहे. 25 एकर पिकाऊ जमीन काढून घेण्यासाठी बुडाचे प्रयत्न सुरू आहेत. विविध योजना राबवून भू-संपादन करण्यात येत असल्याची तक्रारदेखील शेतकऱ्यांनी केली आहे.
कणबर्गी येथील शेतकऱ्यांची जमीन सुपीक असल्याने या जमिनीत तीन टप्प्यात विविध पिके घेतली जातात. या जमिनींबाबत उच्च न्यायालयात तक्रार असली तरी बुडाकडून त्रास दिला जात आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी याबाबत शेतकऱ्यांना एनओसी द्यावी, अशी मागणीदेखील शेतकऱ्यांनी केली आहे. यावेळी अध्यक्ष बबन मालाई, उपाध्यक्ष भवानी मालाई, मनोहर मालाई, इराप्पा अष्टेकर, कृष्णा मालाई, कृष्णा अष्टेकर, पुंडलिक अष्टेकर आदी शेतकरी उपस्थित होते.