लोणावळा / प्रतिनिधी :
मुंबई-पुणे जुन्या महामार्गावरचा खंडाळा बोरघाटातील सायमाळ येथे रिक्षा व बस यांच्यात झालेल्या भीषण अपघातात दोन जण ठार झाले, तर दोन जण जखमी झाले. रविवारी सकाळी 10.50 च्या सुमारास हा अपघात झाला.
कुमार गौरव गौतम (वय 26) आणि शत्रूंजय त्रिपाठी (वय 27) अशी या अपघातात ठार झालेल्यांची नाव आहेत. तर राघवेंद्र राठोड, सौरभ पाठक, रिक्षा चालक किरण वाघमारे हे किरकोळ जखमी झाले आहेत. याबाबतची अधिक माहिती अशी अपघातग्रस्त रिक्षातून रेल्वेचे कर्मचारी लोणावळा येथील वेट अँड जॉय या वॉटर पार्कमध्ये आपली सुट्टी व्यतित करून खोपोली रेल्वे स्टेशनकडे जात होते. बोर घाटातील सायमाळजवळच्या वळणावरील तीव्र उतारावर रिक्षा चालकाचे नियंत्रण सुटल्याने रिक्षा पलटी झाली. त्याच वेळी खोपोलीकडून पुण्याकडे निघालेल्या प्रवासी बसने तिला बाजूने धडक दिली. त्यात गौतम हा जागीच ठार झाले. तर त्रिपाठी याचा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला.
अधिक वाचा : …तर गाठ माझ्याशी, संभाजीराजेंचा चित्रपट निर्माते, दिग्दर्शकांना इशारा
रेल्वेतील लोको पायलटांचा दुर्दैवी मृत्यू
अपघातातील जखमी राघवेंद्र राठोड आणि सौरभ पाठक हे सहाय्यक लोको पायलट पदावर पश्चिम मध्य रेल्वेमध्ये कार्यरत आहेत. तर कुमार गौरव गौतम आणि शत्रूंजय त्रिपाठी हेदेखील सहाय्यक लोको पायलट पदावर पश्चिम मध्य रेल्वेमध्ये कार्यरत होते. रिक्षा चालक हा लोणावळा येथील रहिवासी असून तो खोपोली नगर पालिका रुग्णालयात उपचार घेत आहे. खोपोली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शिरीष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश काळसेकर हे अपघाताचा तपास करत आहेत.