सामूहिक रजेवर गेलेले कर्मचारी माघारी : निलंबितांना पुन्हा सेवेत घेणार : मागण्यांवर संयुक्तपणे तोडगा काढणार
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
आजारपणाचे निमित्त पुढे करत सामूहिक रजेवर गेलेले दोनशेहून अधिक कर्मचारी पुन्हा कामावर रुजू होण्यास सुरुवात झाल्याने एअर इंडिया एक्स्प्रेसमधील कोंडी संपली आहे. ‘लँडिंग’ झालेल्या विमानांचे पुन्हा ‘उड्डाण’ सुरू झाल्यामुळे हजारो प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे. विमान कंपनीने 25 केबिन क्रू मेंबर्सना पाठवलेले टर्मिनेशन लेटर मागे घेण्याचे मान्य केले आहे. त्याचबरोबर केबिन क्रूनेही संप मागे घेतला आहे. गुरुवारी झालेल्या चर्चेअंती विमानसेवा तातडीने सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून प्रवाशांना कोणतीही अडचण येणार नसल्याची दक्षता घेण्यात आली आहे. गेल्या दोन दिवसात एअर इंडिया एक्स्प्रेसची नवी दिल्ली, श्रीनगर, गुवाहाटी, बेंगळूर, गोवा, तिऊवनंतपुरम, कोची, कालिकत, कुन्नूर आणि कोझिकोड अशा विविध शहरातील सेवा खंडित झाल्यामुळे 15 हजारांहून अधिक प्रवाशांना याचा फटका बसला होता. एअर इंडिया एक्स्प्रेसच्या केबिन क्रू मेंबर्सनी पगार, भत्ते आणि कामाच्या परिस्थितीशी संबंधित अनेक मागण्यांसाठी संप (सामूहिक रजा) सुरू केला होता. मंगळवार रात्रीपासून 200 हून अधिक केबिन क्रू मेंबर्सने आजारी असल्याचा दावा करत अचानक कामावर येणे बंद केल्यामुळे 90 उ•ाणे रद्द करण्यात आली. शिस्तभंगाच्या कारवाईचा भाग म्हणून एअरलाईनने या सदस्यांना सेवेतून बडतर्फ करत असल्याचे पत्र पाठवले होते. मात्र, त्यानंतर दोन्ही बाजूंमध्ये गुऊवारी झालेल्या चर्चेअंती त्यांच्यात सामंजस्य करार झाले. कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर विचार करण्यासाठी विमान कंपनीला वेळ दिला आहे.
मुख्य कामगार आयुक्तांसमोर करार
एअर इंडिया एक्स्प्रेस मॅनेजमेंट आणि संपकरी वरिष्ठ केबिन क्रू युनियन यांच्यासोबत मुख्य कामगार आयुक्तांसमोर झालेल्या बैठकीत संप मागे घेण्यावर सहमती झाली. निलंबित केलेल्या कर्मचाऱ्यांनाही पुन्हा कामावर घेतले जाईल. तसेच त्यांच्या मागण्यांवर व्यवस्थापनाकडून गंभीरपणे विचार केला जाणार आहे. एअरलाईन आणि केबिन क्रू आता संयुक्तपणे समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतील. हा करार दोन्ही बाजूंसाठी दिलासा देणारा असल्यामुळे विमान कंपनीला त्यांची उ•ाणे पुन्हा सुरू करण्याची आणि प्रवाशांना चांगली सेवा देण्याची संधी मिळेल. त्याचवेळी, कर्मचाऱ्यांना त्यांच्या मागण्या आणि कामाच्या चांगल्या परिस्थितीचा विचार करण्याचे आश्वासन मिळाले आहे.
यापूर्वीही कर्मचारी आक्रमक
एअर इंडिया एक्स्प्रेसच्या कर्मचाऱ्यांनी विरोध किंवा बंड केल्याची ही पहिलीच घटना नाही. गेल्या महिन्यात एअरलाइनचे व्यवस्थापन योग्यरित्या काम करत नाही आणि कर्मचाऱ्यांच्या वागणुकीत समानतेचा अभाव असल्याचा आरोप एअर इंडिया एक्स्प्रेसच्या केबिन क्रूच्या एका विभागाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या युनियनने केला होता. तसेच एअर इंडिया एक्स्प्रेस एम्प्लॉईज युनियन या नोंदणीकृत युनियननेही कंपनीच्या गैरव्यवस्थापनामुळे कर्मचाऱ्यांच्या मनोबलावर परिणाम होत असल्याचा दावा केला होता.