प्रतिनिधी,विटा
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी बुधवारी सांगली जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्त्यांची मुंबईत बैठक घेतली. या बैठकीला विट्याचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांची उपस्थिती चर्चेत आली आहे. दरम्यान, विकासकामांच्या बाबतीत चर्चा करण्यासाठी आपण बैठकीला गेलो असल्याचे सांगत या वृत्ताला माजी नगराध्यक्ष पाटील यांनी दुजोरा दिला.
राष्ट्रवादीमध्ये बंडखोरी झाल्यानंतर तत्कालीन विरोधी पक्षनेते अजितदादा पवार हे सरकारमध्ये सहभागी होत उपमुख्यमंत्री झाले. त्यानंतरच सांगली जिल्ह्यातून माजी आमदार सदाशिव पाटील यांचा गट अजितदादांसोबत राहील, अशी चर्चा होती. तथापि माजी आमदार पाटील यांनी वारंवार आपण सध्या तरी थोरल्या साहेबांसोबत असल्याचे स्पष्ट केले आहे. याबाबत त्यांची राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशीही चर्चा झालेली आहे. परंतु तरीही माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी असणारे सौख्य लपून राहिले नाही, किंबहुना तेच अधिक चर्चेत राहिले.
गेल्या काही दिवसांत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार पुन्हा सक्रिय झाल्यानंतर अजित पवार गटाने देखील संघटना बांधणीला प्राधान्य दिले आहे. सांगली जिल्ह्याची जबाबदारी दस्तुरखुद्द अजितदादा पवार यांनीच घेतली असल्यामुळे जिल्ह्यातील राष्ट्रवादी अंतर्गत घडामोडींकडे लक्ष लागले आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज बुधवारी मुंबईत सांगली जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेतली. या बैठकीला सांगलीचे काही नगरसेवक, माजी महापौर नेते मंडळी उपस्थित होती. विट्याचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील हे देखील या बैठकीला उपस्थित राहल्याने त्यांच्या अजित पवार गटातील प्रवेशाच्या चर्चा जोर धरू लागल्या आहेत. दरम्यान, याबाबत माजी नगराध्यक्ष पाटील यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगलीतील प्रमुख कार्यकर्त्यांना बैठकीसाठी बोलवले होते. मात्र अशी व्यापक बैठक असल्याची माहिती नव्हती. दादांचा निरोप असल्यामुळे आम्ही भेटायला गेलो होतो. त्याठिकाणी बैठक झाली. विटा नगरपालिकेला आवश्यक असणारा निधी आणि विकास कामे त्याचबरोबर ग्रामीण भागातील ग्रामपंचायतींना मिळणाऱ्या निधीबाबत उपमुख्यमंत्री अजितदादांशी चर्चा केली. पक्ष संघटनेच्या विषयात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जिल्ह्याचे नेते माजी मंत्री जयंत पाटील यांच्याशीही चर्चा करावी लागेल. सर्वजण एकत्र असल्यास पक्ष वाढीला आणखी गती येईल, त्यामुळे सर्वांनी एकत्र राहण्यासाठी दादांनी प्रयत्न करावेत, अशी भूमिका आपण मांडली आहे. याबाबत आपण माजी मंत्री आणि आपल्या जिल्ह्याचे नेते जयंत पाटील यांच्याशी चर्चा करणार आहे. आमचे नेते माजी आमदार सदाशिव पाटील सध्या बाहेरगावी आहेत. ते आल्यानंतर त्यांच्या कानावर सर्व वृत्तांत घातला जाईल. सर्वांशी विचारविनिमय करून मगच निर्णय होईल, असे माजी नगराध्यक्ष पाटील यांनी ‘तरुण भारत संवाद’शी बोलताना सांगितले.