शिरोळ प्रतिनिधी
बारसूच्या ग्रामस्थांनी हाक मारली तर हजारो लोक घेऊन मी जाणार त्यांच्या पाठीशी गंभीर पणे उभे राहणार मला कोणीही अडवू शकणार नाहीत, मी काय गुन्हेगार आहे काय ? मी मराठवाड्याच्या दौऱ्यावर गेलो होतो. रात्री साडेनऊ वाजता रत्नागिरी पोलिस माझ्या घरी थांबले होते. मी आल्यानंतर मला नोटीस दिली गेली. पोलिसांनी रत्नागिरी जिल्ह्यात 31 मे अखेर येण्यास बंदी घातली आहे. सोशल मीडियावर भाष्य करायचे नाही, कुठल्याही वादग्रस्त व्यक्तीविषयी पोस्ट टाकायची नाही. अनेक निर्बंध घातले आहेत ही काय ? मोगलाई आहे का ? असं संतप्त सवाल खासदार राजू शेट्टी यांनी तरूण भारतच्या प्रतिनिधीशी बोलताना केला.
बारसू प्रकरणी रत्नागिरी पोलिसांनी रात्री साडेनऊ वाजता माजी खासदार राजू शेट्टी यांच्या निवासस्थानी राजू शेट्टी यांना दोन पानाची नोटीस दिली आहे. या संदर्भात तरूण भारतच्या प्रतिनिधींनी त्यांची भेट घेतली असता ते म्हणाले की, “हा प्रकल्प कोणासाठी राबवित आहेत ? राज्य सरकारच्या पायाखालची वाळू घसरत आहे. मला जिल्हा बंदी घातली आहे, मी काय गुन्हेगार आहे का ? आपल्या 25 वर्षाच्या कार्य काळात कोणत्याही प्रकारचा गुन्हा केलेला नाही. मी काय क्रिमिनल गुन्हेगार आहे का ? विधानसभा, लोकसभा सदस्य म्हणून मी काम केलं आहे. दोन्ही सभागृहातील सभापतींनी कधीही मला कसलीही साधी नोटीस दिली नसताना या राज्य शासनाच्या रत्नागिरी पोलिसांनी बंदी घालून एक प्रकारे मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न केला आहे. असल्य़ा गोष्टींना मी कदापि भीक घालणार नाही. इंग्रजांच्या काळातही लेखणीला व भाषणाला कधी बंदी घातली गेली नाही. परंतु जिल्हा बंदी आदेश करणे, सोशल मीडियावर कोणते भाष्य न करणे, ही काय लोकशाही आहे का? बारसूच्या ग्रामस्थांनी, शेतकऱ्यांनी हाक मारली तर मी हजारो कार्यकर्ते घेऊन बारसूला जाणारच. रत्नागिरी पोलिस माझं काहीच करू शकणार नाहीत. जनता ही लोकशाहीमध्ये सर्वश्रेष्ठ आहे” असे म्हणताना त्यांनी सरकारने जनतेच्या रेट्याचा फेरविचारची मागणीही केली.