स्टॉकहोम / वृत्तसंस्था
पेंच लेखिका ऍनी अरनॉक्स यांना यंदाचा साहित्याचा नोबेल पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. त्या 82 वर्षांच्या आहेत. आपल्या गतकाळाची त्यांनी केलेली साहसी, पारदर्शी आणि हृदयस्पर्शी मांडणी लक्षात घेऊन त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आल्याचे नोबेल समितीने स्पष्ट केले आहे.
अरनॉक्स यांनी त्यांच्या लेखनाचा प्रारंभ तरुण वयातच चरित्रपर कादंबऱयांपासून केला होता. पुढे त्यांनी ललित लेखन सोडून स्वतःच्याच आठवणी लिहिण्यास प्रारंभ केला. आपला भूतकाळ आणि त्या भूतकाळात त्यांच्या संपर्कात आलेली अवतीभोवतीची माणसे यांचे स्पष्ट आणि प्रामाणिक शब्दचित्रण त्यांनी ओघवत्या भाषेत केले. आपले लैंगिक अनुभव, लैंगिक संघर्ष, गर्भपात, आजारीपण आणि आपल्या मातापित्याचा मृत्यू आदी विषयांवर त्यांनी कोणतीही तडजोड न करता आणि दबावाखाली न येता सत्य परिस्थिती त्यांच्या लेखनात मांडली आहे. ही मांडणी अत्यंत साहसिक स्वरुपाची आहे, अशी प्रतिक्रिया अनेक मान्यवरांनी व्यक्त केली आहे. हेच त्यांचे पारदर्शीत्व लक्षात घेऊन त्यांना साहित्य क्षेत्रातील हा सर्वोच्च पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे, अशी कारणमीमांसा करण्यात आली.
ओल्सन यांची घोषणा
नोबेल पुरस्काराच्या साहित्य समितीचे अध्यक्ष अँड्रेस ओल्सन यांनी अरनॉक्स यांना हा पुरस्कार दिला जात असल्याची घोषणा गुरुवारी केली. अरनॉक्स यांचे लिखाण स्वच्छ आणि साध्या भाषेत आहे. त्यामुळे ते नैसर्गिक आहे. सर्वसामान्यांच्या भावभावनांचे प्रतिनिधीत्व करणारे हे लिखाण आहे. आपल्या लिखाणातून त्यांनी प्रशंसनीय आणि चिरस्थायी असे काहीतरी कमावले आहे. त्यांची भाषा साधेपणातच खुलते. ज्या घटनांचे वर्णन त्या आपल्या साहित्यात करतात ते वस्तुनिष्ठ असते. त्यात भावनाबंबाळपणा तसेच शब्दांचा फुलोरा किंवा फाफटपसारा नसतो. त्यामुळे वाचकांना नेमका विषय समजून घेणे सोपे होते. म्हणूनच त्यांचे लिखाण साधे असूनही अतियश प्रभावी आहे. याच त्यांच्या साहित्यिक वैशिष्टय़ांची जाण ठेवून हा सर्वोच्च पुरस्कार त्यांना देण्यात आला आहे, अशी भलावण ओल्सन यांनी पत्रकार परिषदेत शुक्रवारी केली.
20 हून अधिक पुस्तके
अरनॉक्स यांनी त्यांच्या साहित्यिक आयुष्यात 20 हून अधिक पुस्तकांची निर्मिती केली आहे. त्यांपैकी बहुतेक पुस्तके अतिशय छोटी आहेत. या पुस्तकांपैकी ‘ला प्लेस’ (एका माणसाची जागा) या पुस्तकाने त्यांना जगभरात कीर्ती मिळवून दिली. 2008 मध्ये त्यांचे ‘लेस ऍनीस’ (ती वर्षे) हे पुस्तक प्रसिद्ध झाले. ते सर्वार्थाने गाजले. त्यावर टीकाही मोठय़ा प्रमाणात झाली. या पुस्तकात त्यांनी दुसऱया महायुद्धापासून आतापर्यंयच्या काळातील स्वतःच्या अनुभवांची मांडणी केली आहे. या पुस्तकात त्या स्वतः उल्लेख त्रयस्थाप्रमाणे करतात. स्वतःसंबंधी ‘मी’ या शब्दाऐवजी ‘ती’ हा शब्द उपयोगात आणून त्यांनी स्वतःचेच शब्दचित्रण केले आहे. हे पुस्तकही चांगलेच गाजले होते.