यंदे खूट सिग्नलजवळ कचरा साचून : प्रवाशांना दुर्गंधीचा त्रास
बेळगाव : शहराचे प्रवेशद्वार असलेल्या यंदे खूट सिग्नलजवळ कचऱ्याची समस्या निर्माण झाली आहे. कॅन्टोन्मेंट आणि मनपा प्रशासनाच्या सीमा हद्दीतच ही कचऱ्याची समस्या निर्माण होत आहे. त्यामुळे कोणी हा कचरा उचलावा? या तक्रारीतच कचरा कित्येक दिवस पडून असलेला पाहायला मिळत आहे. शिवाय शहरात इतर ठिकाणी देखील कचरा समस्या गंभीर बनू लागली आहे. त्यामुळे स्थानिकांची मात्र दुर्गंधीने डोकेदुखी वाढू लागली आहे. यंदे खूट सिग्नलजवळ कचऱ्याची उचल न झाल्याने तो साचून आहे. दरम्यान, भटकी जनावरे आणि कुत्र्यांमुळे कचरा सर्वत्र विखुरला गेला आहे. त्यामुळे अस्वच्छतेचे साम्राज्य देखील निर्माण झाले आहे. शेजारीच वाहतूक पोलीस थांबलेले असतात. त्यांनादेखील ही कचऱ्याची डोकेदुखी होऊ लागली आहे. या मार्गावर पश्चिम भागातील आणि कोकणातील प्रवाशांची वर्दळ असते. मात्र, शहरात प्रवेश करतानाच कचरा पाहूनच प्रवेश करावा लागत आहे. त्यामुळे शहराच्या सौंदर्यालादेखील बाधा होऊ लागली आहे.
कचरा वेळेत उचलण्याची गरज
सातत्याने या सिग्नलजवळ कचरा साचून रहात आहे. वेळेत उचल होत नसल्याने ही समस्या निर्माण होत आहे. दरम्यान, या रस्त्यावर हातगाडीवाले आणि भाजीपाला, फळेविक्रेते देखील आपल्याकडील टाकाऊ माल फेकून देत आहेत. त्यामुळे कचरा समस्येत भर पडताना दिसत आहे. मुख्य रस्त्यावरच कचरा समस्या निर्माण होत असल्याने वाहतुकीवर देखील परिणाम होऊ लागला आहे. त्यामुळे कचऱ्याची वेळेत उचल करून स्वच्छता करण्यात यावी, अशी मागणी होऊ लागली आहे.