कुलगुरु डॉ. डी. टे. शिर्के यांचे आवाहन
प्रतिनिधी/ बेळगाव
शिक्षक, विद्यार्थी, प्रशासन आणि समाज या चार स्तंभांवर शिक्षणाचा पाया रचला गेला आहे. हे चारही स्तंभ प्रभावीपणे एकत्रित आल्यास राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करणे सोयीचे होईल. शिक्षकांनी साचेबद्ध शिक्षण पद्धती सोडून बदलत्या पद्धतीनुसार एकरूप झाले पाहिजे. तरच शिक्षणामध्ये बदल घडविता येईल, असे परखड मत शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टे. शिर्के यांनी मांडले.
एसकेई सोसायटीचा स्थापना दिन शनिवारी आरपीडी कॉलेजच्या जिमखाना हॉलमध्ये पार पडला. यावेळी प्रा. डी. टी. शिर्के बोलत होते. संस्थेचे चेअरमन किरण ठाकुर यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम पार पडला. व्यासपीठावर राजमाता पार्वतीदेवी यांचे नातू खेमराज सावंत-भोसले, सोसायटीचे व्हा. चेअरमन प्रा. एस. वाय. प्रभू, उपाध्यक्ष सुधीर शानभाग, सेपेटरी मधुकर सामंत उपस्थित होते.
डॉ. शिर्के म्हणाले, कोरोनामुळे शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल झाले. पुढील काही वर्षात 50 टक्के विद्यार्थी हे ऑनलाईन शिक्षण घेताना आपणाला दिसतील. त्यामुळे या नव्या बदलानुसार शिक्षकांनीही बदलणे गरजेचे आहे. ऑनलाईनमुळे आज परदेशातील विद्यार्थी देखील भारतीय कॉलेजमधील अभ्यास शिकू शकतो. त्यादृष्टीने शिक्षण संस्था व शिक्षकांनी विचार करावा, असे त्यांनी स्पष्ट केले.
चेअरमन किरण ठाकुर म्हणाले, जगातील सर्वांत उत्तम डॉक्टर भारतात तयार होतात. असे असतानाही अनेक विद्यार्थी आज उच्चशिक्षणासाठी परदेशी जात आहेत. देशातील कॉलेज 24 तास चालविली तर दोन ते तीन शिफ्टमध्ये विद्यार्थी शिक्षण घेऊ शकतात. देशात गुणवत्ता आहे, गरज आहे ती राजकीय प्रोत्साहनाची. दिवंगत उद्योजक सुरेश हुंदरे यांनी उभारलेल्या पॉलिहैड्रॉनमध्ये परिवर्तन घडविले ते पाहण्यासाठी बाहेरून उद्योजक येत असतात. त्यामुळे कला, कौशल्यांना प्रोत्साहन महत्त्वाचे आहे. तसेच यापुढील व्यवसायाभिमुख अभ्यासक्रमांकडे लक्ष पुरविले जाईल, असे त्यांनी नमूद केले.
खेमराज सावंत यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत, एसकेईच्या स्थलांतरणाविषयीची माहिती दिली. एसकेई बेळगावमध्ये आली आणि संस्थेने खूप मोठी शैक्षणिक प्रगती केली. पश्चिम महाराष्ट्र, गोवा व बेळगावमधील विद्यार्थी घडविण्यामध्ये एसकेईचा मोठा वाटा असल्याचे स्पष्ट केले.
राजमाता राणी पार्वतीदेवी यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. ‘सूर निरागस हो’ या गणेश वंदनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्राचार्या डॉ. अनुजा नाईक यांनी उपस्थितांचे स्वागत केले. पीयु कॉलेज मॅनेजिंग कमिटीच्या सदस्या लता कित्तूर यांनी एसकेई सोसायटीच्या वाटचालीची माहिती दिली. कॉमर्स विभागप्रमुख सुधीर शिंदे यांनी परिचय करून दिला. प्रा. शर्मिला यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. प्रसन्ना जोशी यांनी आभार मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
शिवाजी विद्यापीठ व बेळगाव हे जुने नाते आहे. बेळगावमधील अनेक शिक्षण तज्ञांनी कोल्हापूरमध्ये शैक्षणिक प्रगती घडविली आहे. अण्णासाहेब लठ्ठे, आप्पासाहेब पवार, गुरुवर्य शामराव देसाई यांच्या शैक्षणिक धोरणामुळे शिक्षण क्षेत्राचा विकास झाला. शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून सेवा बजावणारे आप्पासाहेब पवार हे बेळगावचे होते. त्यांच्या दूरदृष्टीतून शिवाजी विद्यापीठाचा विकास झाल्याचे डॉ. शिर्के यांनी नमूद केले.