विराट हिंदू सभेत जीवदास स्वामीजींनी मांडले विचार
प्रतिनिधी /बेळगाव
हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंतचा सर्व प्रदेश हा हिंदुस्थान आहे. त्यामुळे या हिंदुस्थानाची रक्षा करणे हे प्रत्येक हिंदूचे कर्तव्य आहे. आज प्रत्येकाचे लक्ष हे अर्थार्जनाकडे असून, धर्माकडे कोणाचेच लक्ष नाही. परंतु धर्म टिकला तरच मनुष्य टिकेल. शालेय जीवनापासून धर्म शिकविल्यास विद्यार्थ्यांवर लहान वयातच धर्म संस्कार होतील. त्यांना रामायण, महाभारत, भगवद् गीतेतील अध्याय शिकविल्यास धर्म केव्हाच मागे पडणार नाही, असे विचार जीवदास स्वामी यांनी व्यक्त केले.
हिंदू राष्ट्रसेना व श्रीराम सेना यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी छत्रपती संभाजी उद्यान येथे विराट हिंदू सभा पार पडली. व्यासपीठावर हिंदू राष्ट्र सेनेचे अध्यक्ष धनंजय देसाई, चिक्कमंगळूर येथील दत्तपीठाचे अशोक शर्मा, श्रीराम सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रमोद मुतालिक, महालिंग नंदगावी, जिल्हाप्रमुख रवी कोकितकर यासह इतर उपस्थित होते.
प्रमोद मुतालिक म्हणाले, सावरकर म्हणायचे हिंदू धर्माला ख्रिश्चन अथवा मुस्लिमांची भीती नाही, भीती आहे ती निष्क्रिय हिंदूंची. हिंदू हिंदूचाच द्वेश करतो ही आपली शोकांतिका आहे. यामुळेच परकियांनी आपल्यावर सत्ता केली. त्यामुळे आतातरी सर्व हिंदूंनी एका छताखाली एकत्रित यावे, असे आवाहन त्यांनी केले.
धनंजय देसाई यांनी तरुणाईला छत्रपतींच्या जीवनातील उदाहरणे देऊन धर्म समजावून सांगितला. कार्यक्रमाची सुरुवात मंत्रोपचाराने झाली. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. यावेळी मान्यवर व हिंदू संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.