कोल्हापूर प्रतिनिधी
जालना येथे उपोषणाला बसलेल्या मराठा आंदोलकांवर केलेल्या लाठीमारामध्ये चार आंदोलक जखमी झाले नाहीत तर 40 कोटी मराठे जखमी झाले आहेत. लाठीमार करण्याचा आम्ही आदेश दिला नाही, असं सरकार म्हणतंय. मग त्या मागील सुत्रधार कोण आहे, त्याला योग्य ती शिक्षा द्यावी. तसेच सरकार मराठा समाजाला आरक्षण देऊ शकत नाही तर त्यांनी सत्तेवरून पायउतार व्हावे, असा सूर शहर बंद आंदोलनाच्या समन्वयकांचा होता. उपुख्यमंत्री अजित पवार 10 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत, त्यांना काळे झेंडे दाखवून निषेध करावहृ असे आवाहन करण्यात आले.
अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक म्हणाले, सकल मराठा समाजाने जवाब दो आंदोलन पुकारले आहे. कोल्हापूर शहर बंदला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. जालना येथील लाठीमाराची जबाबदारी सरकारने घ्यावी. 25 वर्षापासून मराठा आरक्षणाची मागणी आहे, परंतु सरकार याकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष करत आहे. केंद्र व राज्य सरकारने मराठा आरक्षणाचा फुटबॉल केला आहे. मराठा आरक्षण देण्याबाबत निर्णय नाहीच, पण शांततेत सुरू असलेल्या आंदोलनावर लाठीमार केला आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा.
दिलीप देसाई म्हणाले, मराठा आरक्षणाचा निर्णय केंद्र सरकारने घेतला पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलावलेल्या विशेष अधिवेशनात मराठा आरक्षणाला मान्यता देऊन, त्याचे कायद्यात रूपांतर करावे. एका रात्रीत दहा टक्क्यांहून ज्यादा ओबीसी आरक्षण कोणी वाढवले, त्याची चौकशी व्हावी. केंद्र व राज्य सरकार कायद्याच्या चौकटीत बसवून मराठा आरक्षण देईपर्यंत आंदोलन सुरूच राहील.
विजय देवणे म्हणाले, कोल्हापूर बंदची हाक देताच मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी प्रेस घेतली. पण मराठा समाजाची माफी मागितली नाही. कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांचा बोलवता धनी कोण आहे, याची चौकशी करावी. मराठा आरक्षण दिले नाही तर सरकारला पायउतार करणार. मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मराठा असूनही दिल्लीच्या तख्तासमोर गुडघे टेकले आहेत. त्यामुळे त्यांना मराठा समाजाचे काही वाटत नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मराठा समाजाची माफी मागून राजीनामा देईपर्यंत आंदोलन सुरू राहील.
व्ही. बी. पाटील म्हणाले, सरकार माफी मागत नाही, आरक्षण जाहीर करीत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरू राहील. मराठा आरक्षणासाठी शांतता पाळून एकजुटीने आंदोलन करूया. सर्वांनी शांततेत आंदोल करावे, असे आवाहन त्यांनी केले.
रविकिरण इंगवले म्हणाले, मुख्यमंत्री शिंदे मराठा असूनही त्यांनी दिल्लीच्या तख्तासमोर मिर्झा राजांची भूमिका घेतली आहे. मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री पवार सत्तापिपासू आहेत. त्यामुळेच मराठा समाजावर लाठीमार होऊनही ते शांत आहेत. उपमुख्यमंत्री पवार कोल्हापूर दौऱ्यावर आल्यानंतर त्यांना काळे झेंडे दाखवून त्यांचा निषेध करूया.
राजू जाधव म्हणाले, सरकार मराठा समाजाची दिशाभूल करत आहे. मराठा समाजावर लाठीमार करणाऱ्या सरकारला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय मराठा समाज स्वस्थ बसणार नाही.
राजू सावंत म्हणाले, माजी खासदार संभाजीराजे छत्रपती उपोषणाला बसले होते, तेंव्हा सरकारने दिलेल्या आश्वासनाची अंमलबजावणी केली पाहिजे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येताना मराठा आरक्षणाचा आदेश घेऊनच कोल्हापुरात यावे, असेही सावंत यांनी सांगितले.
आर. के. पवार म्हणाले, मराठा आरक्षणासाठी सर्वांनी नेत्यांच्या गाडीसमोर उड्या मारू या. भविष्यात नुसते शहर नाही तर संपूर्ण जिल्हा बंद केला पाहिजे. सकल मराठा आरक्षणाच्या मागणीसाठीचे आंदोलन पहिल्यापासून शांततेत सुरू आहे. त्यामुळे याला गालबोट लागणार नाही, याची काळजी घेणार आहोत.
मिलिंद सावंत यांनी मनोगत व्यक्त केले. राष्ट्रगीताने सांगता करण्यात आली. यावेळी सकल मराठा समाजातील शेकडो पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला, युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ‘लाठीहल्ला करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो’, ‘या सरकारचे करायचे काय..’, ‘मराठा आरक्षण जाहीर करा, अन्यथा खुर्च्या खाली करा’, ‘मराठा आरक्षण आमच्या हक्काच, नाही कोणाच्या बापाच’, अशा घोषाणंनी दसरा चौक दुमदुमला.
मी उपमुख्यमंत्री पवार यांच्या गाडीखाली उडी मारणार
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री मराठा आरक्षणावरून मराठा समाजाच्या भावनेशी खेळतात. ते समाजावरील हल्ला सत्तेच्या खुर्चीसाठी विसरले आहेत. लाठीमाराचा आदेश कोणी दिला, याची चौकशी करून, खुनाचा गुन्हा दाखल करावा. मराठा नेत्यांना निवेदन देऊन चालणार नाही, प्राणाची आहुती दिल्याशिवाय सरकार जागे होणार नाही. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार कोल्हापूर दौऱ्यावर आल्यानंतर त्यांच्या गाडीखाली उडी घेईन, असा इशारा संजय पवार यांनी दिला. जालना आणि कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कोणत्या जातीचे आहेत, त्यांची मराठा आरक्षणाविषयी काय भूमिका आहे, याची चौकशी करावी, अशी मागणीही त्यांनी केली.