पुरुषांच्याबरोबरीने महिलांना समान वागणूक, समान संधी : समान नागरी कायद्यामुळे गोव्यात नांदतो धार्मिक सलोखा,राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून गोव्याबद्दल प्रशंसोद्गार
पणजी : गोवा हे देशातील एक अतुलनीय राज्य आहे. सर्वांना माणुसकीची वागणूक देणारी गोव्याची संस्कृती सर्वसमावेशक आहे. निसर्गसंपदा आणि गोमंतकीयांच्या आदरातिथ्याच्या परंपरेमुळे गोव्याला लाभलेले वेगळेपण खुलून दिसते. शैक्षणिक विकासामुळे गोव्याने झपाट्याने विकास साधला आहे. एवढेच नव्हे, तर महिलांना पुरुषांच्याबरोबरीने मान, सन्मान व संधी मिळत आहेत. समान नागरी कायद्यामुळे गोव्यात सर्वांना समान संधी, समान न्याय मिळत आहे. अशा अनेक वैशिष्ट्यांमुळे गोवा हे देशातील एक आदर्शवत राज्य आहे, असे प्रशंसोद्गार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काढले. दोनापावला येथील राजभवनच्या दरबार हॉलमध्ये काल मंगळवारी सायंकाळी आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रपतींच्या नागरी सन्मान कार्यक्रमात त्या बोलत होत्या. व्यासपीठावर राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव उपस्थित होते. राष्ट्रपती पहिल्यांदाच गोवा भेटीवर आल्याने त्यांचा राजभवनातील दरबार हॉलमध्ये नागरी सन्मान करण्यात आला. गोव्याच्या परंपरेचे प्रतीक म्हणून लामणदिवा, कुणबी साडी, कुणबी शाल देऊन त्यांचा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी उपस्थितांमध्ये कृषिमंत्री रवी नाईक, आरोग्यमंत्री विश्वजित राणे, समाजकल्याण खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई, जलसंपदामंत्री सुभाष शिरोडकर, मच्छीमारमंत्री नीळकंठ हळर्णकर, आमदार दिगंबर कामत, डॉ. देविया राणे, राजेश फळदेसाई, राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे, माजी खासदार विनय तेंडुलकर, अॅड. नरेंद्र सावईकर, विविध सरकारी खात्याचे अधिकारी, जिल्हा पंचायत सदस्य, पालिकांचे पदाधिकारी उपस्थित होते.
गोव्याच्या परंपरेला जगात महत्त्व
भारत स्वतंत्र झाल्यानंतर सुमारे चौदा वर्षांनी गोवा मुक्त झाला. उशिरा मुक्त होऊनही गोव्याने कला, साहित्य, क्रीडा क्षेत्राबरोबरच सर्वच बाबतीत अतुलनीय अशी कामगिरी केली. गोवा हे पोर्तुगीज राजवटीत असताना येथील लोकांनी, स्वातंत्र्यसैनिकांनी गोव्याची सांस्कृतिक, धार्मिक, सामाजिक एकात्मता टिकवून ठेवली. त्यामुळे गोव्याच्या परंपरेला जागतिक पातळीवर ऐतिहासिक महत्त्व आहे. गोव्याने देशात सर्वच बाबतीत उत्कृष्ट कामगिरी केल्याने येथील प्रत्येक नागरिक व बांधव कौतुकास पात्र आहेत, अशा शब्दांत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राज्याचे कौतुक केले.
आज सर्वांना संपूर्ण अधिकार व हक्क
राष्ट्रपती पुढे म्हणाल्या, देश पारतंत्र्यात असताना महात्मा गांधी यांनी सांगितले होते की, संपूर्ण इंग्रज सत्ता नष्ट होऊन भारतातील प्रत्येक नागरिकाला संपूर्ण हक्क प्राप्त होतील, तेव्हाच देश स्वातंत्र्य झाला, असे मी मानेन. आज संपूर्ण देशातील नागरिकाला संपूर्ण अधिकार आणि हक्क मिळाले आहेत. त्यामुळे देशातील प्रत्येक नागरिक हा देशाच्या लौकिकात भर टाकत आहे.
गोव्यामुळे देशाची मान उंचावली
गोव्यातील स्वातंत्र्यसैनिकांनी गोवा मुक्तिसाठी दिलेले बलिदान, योगदान हे फार मोठे आहे. ते विसरता कामा नये. येथील प्रत्येक नागरिकांनी सामाजिक सलोखा राखत एकमेकांबद्दल आदर, प्रेम वाढवल्यानेच गोवा पोर्तुगीजांच्या तावडीतून मुक्त झाला. गोव्याने क्रीडा, साहित्य व कला क्षेत्रातही सातासमुद्रापार लौकिक प्राप्त केला आहे. त्यामुळे देशाचीही मान अभिमानाने उंचावली असल्याचे त्या म्हणाल्या.
गोवा हे एकतेचे प्रतीक : राज्यपाल
राज्यपाल पिल्लई म्हणाले की गोवा हे एकतेचे प्रतीक आहे. या ठिकाणी अनेक धर्मीय लोक गुण्या-गोविंदाने राहतात. येथील समुद्रतट व निसर्ग संपदा ही गोव्याच्या सौंदर्यात भर टाकते. मंदिरे आणि चर्च ही गोव्याची शान आहे. काणकोणसारख्या ग्रामीण तालुक्यातही मल्लिकार्जुन मंदिरामुळे आज समाज एकसंध बनला आहे. धार्मिक क्षेत्रामुळे गोव्यात अध्यात्मिकतेचे दर्शन होते. आपण गोव्यातील अनेक ठिकाणी गेलो आहे. गोव्यातील सर्वबांधवांमध्ये प्रेम ठासून भरल्याचे ते म्हणाले.
गोवा एकता, बंधुत्व जपणारे राज्य : मुख्यमंत्री
मुख्यमंत्री सावंत यांनी स्वागतपर भाषणात राष्ट्रपतींच्या गोवा भेटीबद्दल आनंद व्यक्त करून गोव्याची महती सांगितली. गोव्याने मुक्तिनंतर घेतलेली भरारी आणि त्यासाठी योगदान दिलेल्या ज्ञात-अज्ञात, स्वातंत्र्यसेनानी यांच्या योगदानाबद्दल त्यांनी कौतुक केले. गोव्यातील समृद्ध लोकजीवन, आदिवासी समाजबांधवांची सभ्यता, बंधुभाव, राज्यातील प्राचीन प्रस्तर शिल्प, कदंब, मराठा, सातवाहन, चालुक्य या काळातील इतिहास आणि सांस्कृतिक महत्त्व याविषयी त्यांनी कौतुक केले. गोव्यात सर्व धर्मीय लोक गुण्यागोविंदाने राहतात, एकता आणि धार्मिक सलोखा निर्माण करतात. त्यामुळे गोवा हे बंधुत्व जपणारे राज्य आहे, असेही ते म्हणाले.
कलाकारांसमवेत राष्ट्रपतींचे छायाचित्र
राष्ट्रपती मुर्मू यांचा सन्मान झाल्यानंतर कुर्टी-फोंडा येथील श्री सरस्वती केळबाय कला पथकाने गणेशवंदना व पारंपरिक कुणबी नृत्य सादर केले. राष्ट्रपती मुर्मू यांनी कार्यक्रम संपल्यानंतर सर्व कलाकारांसमवेत एकत्रित छायाचित्र काढले. सिद्धी उपाध्ये यांनी सूत्रसंचालन केले.
सहा जणांना वनअधिकार सनदा प्रदान
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राज्यातील सहाजणांना वनअधिकार अधिनियम जमीन सनदा प्रदान करण्यात आल्या. यामध्ये (1) भैरू काळे, मलपण-खेतोडे सत्तरी (मंजूर क्षेत्र – 9,620 स्क्वे. मी., सर्वे नं. 5/1 आणि 7/7), (2) रामा के. गावकर, वायंगिणी-सत्तरी (मंजूर क्षेत्र – 6,350 स्क्वे. मी. सर्वे नं. 3/1), (3) आनंद हरवळकर, ब्रह्माकरमळी-सत्तरी (मंजूर क्षेत्र – 2,500 स्क्वे. मी. सर्वे नं. 35/2), (4) अशोक खांडेपारकर, माटववाडा-धारबांदोडा (मंजूर क्षेत्र – 1000 स्क्वे. मी.), (5) सुकडू बाळू गावकर, वरचावाडा नुंदे – नेत्रावळी सांगे (मंजूर क्षेत्र – 6198 स्क्वे. मी.), (6) तोलू गोविंद पाडकर, इंद्रवाडा गावडोंगरी-काणकोण (मंजूर क्षेत्र – 6567 स्क्वे. मी.) यांचा समावेश होता.
दरबार हॉलमध्ये तर्क-वितर्क
राजभवनातील दरबार सभागृहात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा नागरी सन्मान झाला. राष्ट्रपती पहिल्यांदाच गोव्यात आल्या आहेत. परंतु त्यांच्या सन्मान सोहळ्यास त्या मानाने लोकांची उपस्थिती कमी होती. दरबाल हॉलमधील बहुतांश खुर्च्या रिकाम्या होत्या. याबद्दल उपस्थितांमध्ये उलट-सुलट चर्चा सुरु होती. एरव्ही सरकारच्या इतर कार्यक्रमांना दरबार सभागृह खचाखच भरलेला असतो. परंतु राष्ट्रपतींच्या या सन्मान कार्यक्रमाच्या कमी उपस्थितीमुळे तर्कवितर्क सुरू होते.