रौप्यमहोत्सवानिमित्त मागील पंचवीस वर्षांतील विद्यार्थ्यांना मिळणार लाभ
वार्ताहर /मच्छे
अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेतल्यानंतर चार वर्षात बी. ई. अभ्यासक्रम पूर्ण करू न शकलेल्या व काही विषय मागे ठेवलेल्या विद्यार्थ्यांना विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यापीठाने सुवर्णावकाश (गोल्डन चान्स) योजना तयार केली आहे. विद्यापीठाच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त पंचवीस वर्षांपूर्वी बीई अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या पण विषय राहिलेल्या विद्यार्थ्यांना आता ते विषय काढण्याची संधी देण्यात येणार आहे. इंजिनिअरिंगच्या पहिल्या सेमिस्टर ते सातव्या सेमिस्टरपर्यंत काही विषयांत नापास झाले तरी पुढील वर्षी प्रवेश मिळण्याची संधी असते. अशाप्रकारे विषय प्रलंबित ठेवलेल्यांना अभियांत्रिकीचा 4 वर्षांचा अभ्यास पूर्ण झाल्यानंतर पुढील 3 वर्षांत अनुत्तीर्ण विषयांसाठी पुन्हा परीक्षा द्यावी लागते. सर्व विषयांत उत्तीर्ण झाल्यास अभियांत्रिकी पदवी मिळते. परंतु विविध कारणांमुळे अनेक विद्यार्थ्यांना मागे राहिलेले विषय सोडविण्यासाठी परीक्षा देता येत नाही. प्रलंबित विषयही पास होत नाहीत, अशा विद्यार्थ्यांसाठी ’सुवर्णावकाश’ योजना ही पदवी मिळविण्यासाठी वरदान ठरणार आहे.
रौप्यमहोत्सवी ऑफर
या योजनेंतर्गत विद्यार्थ्यांची 2 वेळा पुन्हा परीक्षा घेतली जाईल. या संधींमध्ये विद्यार्थ्यांना आपले मागे राहिलेले विषय सोडवून पदवी प्राप्त करून घेता येणार आहे. विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यापीठ 1998 मध्ये स्थापन झाले असून 2022-23 मध्ये रौप्यमहोत्सव साजरा करीत आहे. यानिमित्त विद्यार्थ्यांना गोल्डन चान्स बहाल करण्यात आला आहे. यासाठी स्वतंत्रपणे नोंदणी करावी लागणार आहे. याबाबत फेब्रुवारीअखेर व्हीटीयूच्या संकेतस्थळावर सविस्तर माहिती उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
फायदा कोणाला?
ज्या विद्यार्थ्यांनी 25 वर्षांपूर्वी अभियांत्रिकीमध्ये प्रवेश घेतला, 4 वर्षे अभियांत्रिकीचा अभ्यास केला आणि काही विषय मागे ठेवले त्यांना ही पुनर्परीक्षा लिहिण्याची परवानगी आहे. ही संधी एमटेक, एमबीए विद्यार्थ्यांसाठीही आहे. परंतु त्यांनी संबंधित पदवीच्या अंतिम वर्षापर्यंत शिक्षण घेतलेले असणे बंधनकारक आहे. ही संधी पहिल्या, दुसऱया किंवा तिसऱया वर्षात शिकत असताना कॉलेज सोडलेल्या विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार नाही.