राज्य सरकार जबाबदार, आरजीचा आरोप
प्रतिनिधी /पणजी
राज्यातील युवकांचा कौशल्य विकास करण्यासाठी केंद्र सरकारकडून मोठय़ा प्रमाणात पैसा येत असतो मात्र राज्य सरकार त्याचा उपयोग योग्यरितीने करीत नाही, असे आरोप आरजीचे सर्वेसर्वा मनोज परब यांनी केले आहेत. युवकांना कौशल्य शिक्षण मिळत नाही त्यामुळे राज्यातील अधिकाधिक युवकांना बेकारीला सामोरे जावे लागते, असेही परब म्हणाले.
काल सोमवारी पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत मनोज परब बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत आरजीचे विश्वेश नाईक उपस्थित होते. राज्यात मोठमोठे उद्योग तसेच कंपनी आहेत मात्र या कंपनीमध्ये अधिकाधिक परप्रांतीय काम करीत आहेत. गोवा सरकार खासगी कंपनीत गोमंतकीय युवकांसाठी नोकऱया आरक्षित करू शकत नाही. राज्यातील सरकार हे गोमंतकीय युवकांचे की कंपनी मालकांचे, असा प्रश्न मनोज परब यांनी उपस्थित केला आहे.
गोव्यात ज्या मोठमोठय़ा कंपनी आहेत त्यात गोमंतकीय युवकांना नोकरीसाठी प्रधान्य मिळत नसेल तर गोवा सरकारच्या सवलती घेऊन गोव्यात चालणाऱया या कंपनींचा काय फायदा. गोव्यातील शिक्षित युवकांना चांगल्या नोकऱया मिळत नसल्याने ते विदेशात नोकरीसाठी जाणे पसंत करतात. गोमंतकीय युवक परदेशात जातात आणि परप्रांतीय लोकांचा गोव्यात भरणा होत आहे. सरकारने गोमंतकीय युवक गोव्यात राहातील याच्यासाठी उपाययोजना केल्या पाहिजे. आज प्रत्येक युवकाला सरकारी नोकरी पाहिजे असे नाही तर चांगल्या कंपनीत योग्य पध्दतीची नोकरी मिळाली तरी युवक धन्य मानतो मात्र सरकारच्या नाकर्तेपणामुळे गोमंतकीय सुशिक्षित युवकांना कंपनी चांगली नोकरी मिळत नाही, अशी टीकाही मनोज परब यांनी केली आहे.
गोव्यातील युवक केवळ सरकारी नोकरी शोधतात या मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याचे खंडन करीत मनोज परब म्हणाले की, गोव्यातील कित्येक युवक खासगी कंपनीत नोकरीसाठी अर्ज करतात मात्र त्यांना नोकरीत घेतले जात नाही. खासगी कंपनीत गोमंतकीय युवकांना रोजगार मिळावा यासाठी गोवा सरकारने कोणतीही तरतूद केली नाही. केवळ आपली मतपेटी तयार करण्यासाठी परप्रांतीय युवकांना गोव्यात येण्याची संधी दिली जाते, असेही मनोज परब म्हणाले.