आठवणींच्या फुलांनी जसे टांगले दिवस माझ्या घराला तोरण तुझे बांधले दिवस
वय पुढे पुढे जाताना मन मागे मागे जात असतं. आठवणींची गर्दी मेंदूत होते. का कोण जाणे पण बऱ्याचदा या आठवणी छळायला लागतात. आनंदाचे क्षण उपभोगत असताना ते हातातून कधी निसटून जातात ते कळेपर्यंत हातात वास्तवाचे जळजळीत निखारे येऊन पडलेले असतात. आपापल्या वाटणीला आलेलं दिव्य करायला आपण चालत राहतो. चटके बसण्याची सवय झालेली असते. त्रास होतो तो चांगल्या क्षणांचा. ‘बालपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा’ म्हणतात खरं. पण खुद्द लहान मुलांना हे बालपण नकोसं झालेलं असतं. कधी एकदा आपण मोठे होतोय असं त्यांना वाटतं. पण जसजसे दिवस पुढे जातात, लहानपण संपतं आणि माणूस प्रपंचाच्या घाण्याला जुंपला जातो तेव्हा मात्र तो सारखा पाठी वळून पाहत राहतो. त्याला उतरणीला लागलेले आईवडील दिसतात. गावचं घर दिसतं, लहानपणी मित्र जमवून खेळलेले खेळ आठवतात, जिन्याच्या पायऱ्या, त्यातून गडगडल्याची आठवण, सुटीतला रानमेवा, मामाचा गाव, आजीआजोबांचा पाठीवरून मायेने फिरणारा, सुकलेला, थरथरता हात यापैकी कोणत्याच आठवणीत रमण्यापुरताही वेळ आता त्याच्यापाशी शिल्लक नसतो. आणि चुकून कधीतरी पॉडकास्टमध्ये किंवा प्लेलिस्टमध्ये हे गाणं लागतं.
माजघरातील उजेड मिणमिणवृद्ध काकणे करिती किणकिण
किणकिण ती हळु ये कुरवाळू
दूरदेशिचे प्रौढ लेकरू
आणि मग भूतकाळातले रम्य दिवस माणसाचा जीव जाळायला लागतात. तो मनाशीच म्हणतो, गेले ते दिन गेले.
याच आठवणींच्या राज्यात कितीतरी म्हातारे आणि कधीकधी एकट्या म्हाताऱ्या सुद्धा गावातील भल्यामोठ्या घरात आपले एकूटपणाचे दिवस घालवीत राहतात. धोधो पावसाळ्यातही आपले थकलेले, संधिवाताने कुरकुरणारे पाय सांभाळीत गडखी, परडी घेऊन फुलं गोळा करतात, गंध उगाळतात, पूजा करतात, थरथरत्या हाताने घंटा वाजवतात. कापऱ्या आवाजात आरत्या म्हणतात. असेलच एकटंदुकटं जनावर गोठ्यात, तर त्याच्या खोड्या सांभाळतात, वेतं काढतात. अगदी चुलीच्या उबेत बसणाऱ्या मांजरीच्या पिलांची चिंताही वाहतात. कशाकशासाठी करतात हे सगळं? तर या प्रत्येक गोष्टीत त्यांच्या मुलानातवंडांच्या आठवणी दडलेल्या असतात. या पडवीत बयो सागरगोटे खेळत बसायची, त्या गडग्यावरून बंड्या खाली आला होता. ती पलीकडची काजवीण भरपावसात कोसळली तेव्हाच नेमकी गोठ्यात गाय वीत होती, धाकटी लग्न होऊन घरात आली तेव्हाच पट्टीचे पैसे घेऊन माणूस घरात आला होता, अशा असंख्य आठवणी असतात त्यांच्याही. एकेकाळी घरात दणक्यात शुभकार्य झालेली असतात, आंब्यांच्या, संत्र्यांच्या आढ्या पडलेल्या असतात. पंक्तीवर पंक्ती उठलेल्या असतात. लाडवाजिलब्यांचे ढीग संपलेले असतात. मंगलकार्याची तोरणं दरवाजाला लागलेली असतात. घरच्या बैठकीत हास्यविनोदाचे कल्लोळ उठलेले असतात.
आता मात्र घरापुढच्या अंगणात वेडंवाकडं गवत वाढलेलं असतं. ज्येष्ठ केव्हाच फोटोत जाऊन बसलेले असतात. झेपेल आणि माणूस मिळेल तशी केलेली साफसफाई आता पुरेशी पडत नसते. कुठे एखादं बिजागर उचकटलेलं तर एखाद्या दरवाज्याची कडीच नादुरुस्त झालेली असते. थकलाभागला म्हातारा किंवा म्हातारी स्वत:शीच पुटपुटते, तेव्हा डबा डबा पोळ्या केल्या तरी दुपारलाही पुऱ्या पडायच्या नाहीत. आणि आता बुडकुल्यातलं भातवरणही उरतं. गेले ते दिन गेले…
विहिरीवर, आमराईत, कुठेतरी प्रेम फुललेलं असतं. अन् कुठेतरी दुर्दैव आड येऊन ते अपुरंच राहिलेलं असतं. त्याच्या डोळ्यांदेखत तिची पाठवणी लांबवरच्या सासरघरी होते. स्वप्नांचा चुरा चुरा झालेल्या त्याला तेव्हा रडायलाही उसंत नसते. घरात, गोठ्यात, शेतात राबताना नुकतीच फुललेली फुलं बघितली की ती आठवते. नागपंचमीच्या झुल्यावर त्याचा जीव तिच्या आठवणीत झुलत बसतो. पाटाचं खळखळ वाहणारं पाणी तिच्या खळाळत्या हास्याची आठवण करून देत रहातं. असं आयुष्य सरतं. संसार हा मांडावाच लागतो. त्यातली सगळी कर्तव्यही पुरी करून होतात. पण आयुष्याच्या संध्याकाळी
त्या दिसां वडाकडेन गडद तिनसाना
मंद मंद वाजत आयली तुझी गो पैंजणा
अशी सरसरून येणारी आठवण पैंजण वाजवत येते. बाकीबाब बोरकरांना परकायाप्रवेश इतका अवगत होता की प्रत्येक ज्येष्ठांचा श्वास ओलावून सोडणारी ही त्यांची गाणी आहेत. दोघांच्या किंवा एकट्याच्या, रिकाम्या झालेल्या घरात संध्याकाळी शांतपणे आरामखुर्चीत बसल्या बसल्या हे कोवळ्या वयातलं ठसठसणारं प्रेम आठवतं. माणूस मनाशीच म्हणतो.
तांतले काय नुल्ले आज
सगळ्या जिणेंक आयली सांज
तरी अकस्मात तुझी वाजती पैंजणा
छान क्षण जगलो, तिच्यासोबत चंद्रलोकात फिरलो. सारं संपून गेलं.. गेले ते दिन गेले..
सुखाचे दिवस फार लवकर सरतात बाप्पाहो! दु:ख मात्र सुळावरच्या ख्रिस्तासारखं मानगुटीवर वाहून न्यावं लागतं. ते ओझं सुसह्य करण्यासाठी त्या सुखाच्या दिवसांच्या आठवणी उपयोगी पडतात खऱ्या पण त्या आठवणी छळतातही तितक्याच.
निर्मलभावे नवदेखावे
भरुनि दोन्ही डोळे
तू मी मिळुनी रोज पाहिले
गेले ते दिन गेले
म्हणूनच हे गाणं फार फार त्रास देतं. काळजात वेदना व्हायला सुरुवात होते हे ऐकल्यावर. आठवणीचं मोहोळ कुठे फुटेल हे सांगता येत नाही. कधी कॉलेजच्या गेटवर तर कधी आपण शिकलो त्या शाळेत, कधी आपल्याच रिकाम्या घरात किंवा मग एखाद्या गाण्याच्या कार्यक्रमात.. अशावेळी आपल्या हाती फक्त सुस्कारे टाकणं उरतं.
कदंबतऊला बांधून दोला
उंच खालती झोलें
एकमेकां दिले घेतले
गेले ते दिन गेले…
बस्स एवढंच…
-अॅड. अपर्णा परांजपे-प्रभु