जनतेच्या प्रक्षोभामुळे सोडला होता देश
@ कोलंबो / वृत्तसंस्था
श्रीलंकेचे माजी राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे पुन्हा स्वदेशी परतले असून, त्यांना कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत कोलंबोच्या बंदारनायके आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन सुरक्षित स्थानी नेण्यात आले आहे. विमानतळावर त्यांच्या स्वागतासाठी विद्यमान श्रीलंका सरकारमधील अनेक मंत्रीही उपस्थित होते, अशी माहिती देण्यात आली.
श्रीलंकेत अन्नटंचाई आणि महागाई विरोधात उसळलेल्या जनक्षोभामुळे राजपक्षे यांनी 13 जुलैला देश सोडून मालदीव येथे पलायन केले होते. जुलैच्या पहिल्या आठवडय़ात सुरु झालेले हे जनआंदोलन अद्यापही पूर्णतः संपलेले नाही. 9 जुलैला आंदोलनकर्त्या संतप्त नागरीकांनी थेट राष्ट्राध्यक्षांच्या निवासस्थानाचाच ताबा घेतला होता आणि तेथे अनेक लोकांनी वास्तव्य केले होते. त्यावेळी राजपक्षे आपले निवास्थान सोडून अन्यत्र पळालेले होते. नंतर चारच दिवसांमध्ये त्यांनी देश सोडला. प्रथम मालदीव, नंतर सिंगापूर, थायलंड असा प्रवास त्यांनी केला. तथापि, कोणताही देश त्यांना थारा देण्यास तयार न झाल्याने त्यांनी पुन्हा स्वदेशात परतण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ते देशात परतले आहेत.
सुरक्षा वाढविण्याची मागणी
राजपक्षे यांच्या श्रीलंका पीपल्स पार्टी या पक्षाने सरकारकडे राजपक्षे यांची सुरक्षा वाढविण्याची मागणी केली आहे. त्यांच्या जीवाला धोका असल्याचा आरोप पक्षाच्या वतीने करण्यात आले. प्राप्त परिस्थितीसाठी केवळ राजपक्षे यांना उत्तरदायी मानता येऊ शकणार नाही. त्यांची धोरणे श्रीलंकेच्या हिताचीच होती. त्यामुळे संतप्त नागरीकांपासून त्यांना वाचविणे हे सरकारचे कर्तव्य आहे. सरकारने ते पार पाडले पाहिजे, असे प्रतिपादन श्रीलंका पीपल्स पार्टीच्या मंडळाने केले.
राजकीयदृष्टय़ा आजही प्रभाव
गोटाबाया राजपक्षे आणि महिंदा राजपक्षे हे श्रीलंकेतील दोन अत्यंत प्रभावी राजकीय नेते मानले जातात. आजवरच्या त्या देशाच्या इतिहासात सीरीमाओ बंदारनायके यांचा अपवाद वगळता या दोन नेत्यांइतकी लोकप्रियता कोणालाही लाभलेली नाही. त्यामुळे काही दिवसांनंतर श्रीलंकेतील जनता त्यांना पुन्हा स्वीकारेल असा विश्वास राजपक्षे यांच्या निकटवर्तीयांनी व्यक्त केला. आरोपमुक्त झाल्यास ते पुन्हा सन्मानाने राजकारणात प्रवेश करण्याची शक्यता आहे.
आर्थिक संकटाला जबाबदार
श्रीलंकेच्या विद्यमान आर्थिक संकटाला गोटाबाया राजपक्षे प्रमुखतः जबाबदार मानले जातात. त्यांनी निसंर्ग शेतीचे धोरण स्वीकारले. त्यामुळे खते आयात करण्यास त्यांनी अनुमती नाकारली. परिणामी श्रीलंकेतील धान्योत्पादन मोठय़ा प्रमाणात कमी झाले. देशात अभूतपूर्व अन्नटंचाई निर्माण झाली. त्यामुळे महागाईही प्रचंड प्रमाणात वाढली. याशिवाय त्यांनी देशाचे धन मोठय़ा प्रमाणात आपल्या नावे विदेशी बँकांमध्ये जमा केल्याचाही आरोप आहे. श्रीलंका, मालदीव, अमेरिका आदी देशांमध्ये त्यांची अब्जावधी रुपयांची मालमत्ता असल्याचा आरोप आहे. त्यांच्या धोरणामुळे पेट्रोल आणि डिझेलची टंचाईही निर्माण झाल्याचे बोलले जाते.
सर्वत्र नकार
गोटाबाया राजपक्षे यांनी देश सोडल्यानंतर त्यांना स्थायी व्हिसा देण्यास कोणताही देश तयार झाला नाही. त्यांचे अनेक देशांच्या प्रमुखांशी निकटचे संबंध आहेत. मालदीवचे अध्यक्ष त्यांचे जवळचे मित्र मानले जातात. तथापि, यांच्या आंतरराष्ट्रीय मित्रांपैकी कोणीही त्यांना थारा देण्यास नकार दिल्याने अनेक देश फिरल्यानंतर त्यांना पुन्हा श्रीलंकेतच आसरा घ्यावा लागला आहे.
भवितव्य जनतेच्या हाती
ड श्रीलंकेत परतलेल्या गोटाबाया राजपक्षे यांच्यावर जनता आजही संतप्त
ड त्यांना देशात परत घेण्यास अनेक संस्थांनी केला उघड विरोध
ड किमान वर्षभर त्यांना कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत रहावे लागणार
ड श्रीलंकेच्या विद्यमान प्रशाननामध्येही त्यांचे बरेचसे हितचिंतक