पुणे / प्रतिनिधी :
खारघरमध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कारादरम्यान घडलेल्या दुर्घटनेत 13 जण गेल्याचे सरकार सांगते. पण प्रत्यक्ष लोक सांगतात 50 ते 75 जण मयत झाले आहेत. सरकार दबाव तंत्राचा वापर करत आहे. अमानवीय घटना दाबून टाकण्याचा प्रयत्न निर्लज्ज सरकार करत आहे, असा आरोप काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केला.
लोंढे म्हणाले, सरकारने एक सदस्य चौकशी समिती नेमणे चुकीचे असून, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांमार्फत चौकशी झाली पाहिजे. सरकार प्रणित हा गुन्हा घडला असून टेंडर मिळालेल्या दोन कंपन्यांना काळया यादीत टाका. मयत व्यक्तींना 25 लाख रुपये मदत आणि जखमींना 10 लाख रुपये मदत दिली पाहिजे. महाराष्ट्र भूषण पुरस्कारावेळी उष्माघाताने लोक दगावले हा मुद्दा काँग्रेसने प्रथम उचलला. सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा सांगितले. वेगवेगळे राज्य पुरस्कार बंदिस्त हॉलमध्ये घेण्यात येतात. परंतु सरकार प्रत्येक गोष्टीचा इव्हेंट करू पाहत आहे. त्यात माणसे मारण्याचा विचार ही सरकार करत नाही.
अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या पुरस्कारासाठी हा कार्यक्रम घेतला की पैसे कमविण्यासाठी हा प्रश्न निर्माण झाला आहे. हवामान विभागाने उष्णता अधिक असल्याचे सांगितले तरी सरकारने हा कार्यक्रम कसा घेण्यात आला. पाण्यावाचून लोक मरत असताना, देशातील आणि राज्यातील महत्वाचे लोक भाषण सुरू ठेवत होते ही बाब दुर्देवी आहे. 20 लाख लोकांसाठी केवळ 500 खासगी सुरक्षारक्षक नेमण्यात आले होते. या दुर्घटनेची जबाबदारी सरकारची असून प्रत्येक गोष्टीत राजकारण करत आहे, असा आरोपही लोंढे यांनी यावेळी केला.