ऑनलाईन टीम/तरुण भारत
Bhagat Singh Koshyari In Delhi : राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor bhagat singh koshyari) यांनी औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील (Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University) दीक्षांत समारोह सोहळ्यात बोलताना छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यावरून राज्यपालाच्या वक्तव्याच्या राज्यभरातुन निषेध केला जात असून शिंदे-फडणवीस सरकारवरही जोरदार टीका केली जात आहे. आता भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून राज्यपाल कोश्यारींना दिल्लीला बोलावणं आलं असून ते दिल्लीत दाखल झालेत. त्यामुळं आता सततच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची महाराष्ट्राच्या राज्यपाल पदावरून उचलबांगडी होणार असल्याची राजकीय चर्चा रंगली आहे.
औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात छत्रपती शिवाजी महाराज हे जुन्या काळातील आदर्श असून आताचे आदर्श हे नितीन गडकरी आहेत असं वक्तव्य राज्यपाल कोश्यारी यांनी केलं होतं. याआधी याशिवाय समर्थांशिवाय शिवाजीला कोण विचारेल?, असंही वादग्रस्त वक्तव्य कोश्यारींनी केलं होतं. त्याचबरोबर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि ज्योतिराव फुले यांच्याबाबतही कोश्यारींनी अपमानास्पद वक्तव्य केलं होतं. गुजराती आणि राजस्थानी लोक निघून गेले तर मुंबई देशाची आर्थिक राजधानी राहणार नसल्याचंही वादग्रस्त वक्तव्य राज्यपाल कोश्यारींनी केलं होतं. त्यामुळं आता केंद्रातील मोदी सरकार राज्यपालांबाबत काय निर्णय घेणार, याकडे राज्याचं लक्ष आहे.
हे ही वाचा : जबाबदार व्यक्तीची राज्यपाल म्हणून नियुक्ती करावी ; कोश्यारींच्या वक्तव्यानंतर शरद पवारांची प्रतिक्रिया
महाराष्ट्राच्या राज्यपाल हदवरुन कोश्यारींची उचलबांगडी होणार?
राज्यपाल भगतसिंग कोश्यारींच्या सततच्या वादग्रस्त वक्तव्याने भाजपच्या अडचणी वाढत आहेत. दरम्यान, राज्यात सत्तांतर झाल्यानंतरही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वादग्रस्त वक्तव्यांची मालिका सुरूच आहे. त्यामुळं शिंदे-फडणवीस सरकारची मोठी राजकीय अडचण होत आहे. कोश्यारींच्या वक्तव्यामुळं फडणवीस-शेलार यांच्यातील सुप्त संघर्षही चव्हाट्यावर आला. त्यामुळं आता दिल्लीतील नेते राज्यपाल कोश्यारींची बदली करणार की त्यांची कानउघाडणी करून पुन्हा महाराष्ट्रात पाठवणार, याविषयी सर्वांना आतुरता आहे.