शासनाने भरपाईत केली ५ लाखांची वाढ
कोल्हापूर/प्रतिनिधी
वन विभागाकडून वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात बळी गेलेल्यांच्या वारसांना आता 20 लाखांची मदत मिळणार आहे. यामध्ये तातडीने 10 लाख व उर्वरीत रक्कम फिक्स डिपॉझिटमध्ये राहणार आहे. यापुर्वी भरपाई 15 लाखांपर्यत मिळत होती. शासनाने अशा घटनांत अपंगत्व आलेल्यांना 5 लाखांची मदत कायम ठेवली आहे. पाळीव प्राण्यांपोटी भरपाईच्या रक्कमेत वाढ केली आहे. त्यामुळे भविष्यात माणूस आणि प्राणी यांच्यातील संघर्ष कमी होण्यास मदत होणार आहे. (Govt hikes to Rs20 lakh sops for human death in wild animal attack)
राज्यात वन्य प्राण्यांकडून होणाऱ्या हल्ल्यांत वाढ झाली आहे. त्यांच्याकडून होणारी पशुहानी, पीक हानीतही वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर माणूस आणि प्राणी यांच्यातील संघर्ष टाळण्यासाठी 12 वर्षांत सातत्याने या मदतीत वाढ केली आहे. वाघ, बिबट्य़ा, अस्वल, गवा, रानडुक्कर, लांडगा, तरस, कोल्हा, मगर, हत्ती व रानकुत्र्यांच्या हल्ल्यात व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसांना मदत दिली जाते. वन्य प्राण्याकडून होणाऱ्या पशुधन हानीपोटीही मदत केली जाते. यापुर्वी वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात बळी गेलेल्या व्यक्तीच्या वारसांना 15 लाखांची मदत दिली जात होती. ही रक्कम कमी असल्याने त्यात वाढीची मागणी होत होती.
राज्याच्या वन, महसूल मंत्रालयाकडून वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात व्यक्तीचा मृत्यू झाल्यास 20 लाखांची भरपाई दिली जाणार आहे. यामध्ये 10 लाखांची मदत त्वरीत धनादेशाद्वारे दिली जाणार आहे. उर्वरित 10 लाख रूपये संबंधितांच्या संयुक्त खात्यावर फिक्स डिपॉझिट म्हणून ठेवली जाणार आहे. यामध्ये 5 लाख रूपये 5 वर्षासाठी आणि 5 लाख 10 वर्षांसाठी फिक्स डिपॉझिटमध्ये ठेवण्याची तरतूद आहे. पुर्वीच्या तुलनेत या मदतीत 5 लाखांनी वाढ केली आहे.
वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात कायमस्वरूपी अंपगत्व आल्यास 5 लाखांची तर व्यक्ती गंभीररित्या जखमी झाल्यास 1 लाख 25 हजारांची मदत पुर्वीप्रमाणेच केली जाणार आहे. व्यक्ती जखमी झाल्यास प्रती व्यक्ती औषधोपचाराचा 20 हजारांपर्यत खर्च दिला जाणार आहे. यात 5 हजारांनी वाढ केली आहे. यासंदर्भातील अध्यादेश मंगळवारी रात्री उशिरा निघाला आहे.
वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात गाय, म्हैस, बैल, मेंढी, बकरी, अन्य पशुधनाची हानी होते. या पशुहानीपोटी पुर्वी 60 हजारांपर्यत भरपाईत दिली जात होती. यामध्ये 10 हजारांनी वाढ केली आहे. आता गाय, म्हैस, बैलाचा मृत्यू झाल्यास 70 हजार रूपये किंवा बाजारभावाच्या किमतीच्या 75 टक्के रक्कम दिली जाणार आहे. मेंढी, बकरीसाठी ही रक्कम 5 हजारांनी वाढवली आहे. जनावरांना अपंगत्व आल्यास 20 हजार रूपयांपर्यत भरपाई पशुवैद्यकीय अधिकाऱयाच्या प्रमाणपत्रानुसार दिली जाणार आहे.
वनाधिकाऱ्यांवर होणार दंडात्मक कारवाई
वन विभागाकडून वन्य प्राण्यांच्या हल्ल्यातील वारसांना 10 दिवसांत तातडीने भरपाई देण्याची तरतूद आहे. ती न दिल्यास वनाधिकाऱ्यांवर दंडात्मक कारवाई होते. तसेच 30 दिवसांत उर्वरित मदत लाभार्थ्यांना न दिल्यास संबंधित अधिकारी चौकशीच्या फेऱयात अडकू शकतो. त्यामुळे वन विभागाकडून अशा प्रकरणांची तातडीने निर्गत होत असल्याची माहिती वनाधिकाऱ्यांनी दिली.