गवताखालील जीवजंतू, वनस्पती, झाडांचे प्रचंड नुकसान
अहिल्या परकाळे कोल्हापूर
शिवाजी विद्यापीठातील गवताला गेल्या वर्षभरात पाचवेळा आग लागली. या आगीचे तांडवात विझवण्यासाठी अग्निगमनचे जवान आणि विद्यापीठाच्या सुरक्षा रक्षकांची त्रेधातिरपीट उडाली. ‘झाडे लावा, झाडे जगवा’च्या नाऱ्यानुसार विद्यापीठात प्रचंड प्रमाणात वृक्ष लागवड केली आहे. सेंद्रीय खतनिर्मिती करण्यासाठी गवताचे ढीग लावून ठेवले होते. याच गवताला आग लावल्याने या आगीत झाडे आणि जीवजंतूसह संपूर्ण जैवविविधता जळून खाक झाली आहे. देश-विदेशात चर्चेत असलेली जैवविविधता आगीत नष्ट होत असल्याचे समोर येत आहे.
शिवाजी विद्यापीठातील पर्यावरणशास्त्र अधिविभागाच्या पाठीमागे खतनिर्मितीसाठी ठेवलेल्या गवताला आठवड्यात दोनवेळा आग लागल्याने सुरक्षा रक्षकांचा गोंधळ उडाला. अग्निगमन दलाच्या जवानांना पाचारण करीत पाण्याचे दोन बंब आणि विद्यापीठातील पाण्याच्या टँकरच्या सहाय्याने आग विझवण्याचा प्रयत्न केला. दोन्ही वेळेला रविवारचा दिवस असल्याने विद्यापीठातील अधिकाऱ्यांना आग विझेपर्यंत थांबून राहावे लागले. तब्बल पाच ते सहा तासांनी आग विझली. या आगीत जीवजंतू, पक्षी, प्राणी आणि विविध औषधी वनस्पती जळून खाक झाल्या आहेत. एवढेच नाही तर या आगीत जनावरांच्या चाऱ्याचे आणि खताचे नुकसान झाले. आगीमुळे हवा प्रदुषणासह तापमानातात वाढ झाली. विद्यापीठात हिरवळ वाढवण्यासाठी प्रशासनाकडून अनेक प्रयत्न केलेल्या प्रयत्नाला एक प्रकारचे गालबोटच लागले म्हंटले तर वावगे ठरणार नाही.
विद्यापीठ परिसराची ऑक्सिजन हब म्हणून ओळख
ऑक्सिजन हब असलेल्या शिवाजी विद्यापीठ सार्वजनिक शिवाजी विद्यापीठात फिरायला येणाऱ्या लोकांची संख्या जवळपास दीड ते दोन हजार आहे. फिरायला येणारे लोक अनेकदा सिगारेट ओढताना दिसतात. ओढून अर्धवट राहिलेली सिगारेट टाकल्याने गवताला आग लागते. दिवाळीच्या सुट्टीत तर सिगारेटच्या धुराना मधमाश्या खवळल्या आणि एका प्रतिष्ठित डॉक्टरच्या जावयावर मधमाश्यांनी हल्ला केला होता. फिरायला येणारे काही लोक रस्त्याने न फिरता जंगलासह गवत असलेल्या परिसरात फिरतात. त्यामुळे फिरणाऱ्यांपैकीच एखाद्याने गवताला आग लावली असेल, अशी चर्चा विद्यापीठ वतुळात आहे. सार्वजनिक विद्यापीठ म्हणून फिरण्याची परवानगी मागणाऱ्यांनी येथील जैवविविधता, मालमत्ताही आपलीच असल्याचे समजले पाहिजे, अशा प्रक्रियादेखील नाव न सांगण्याच्या अटीवर पुढे येत आहेत.
झाडे वाढवण्यासाठी कित्येक वर्षे लागतात
विद्यापीठात दरवर्षी वृक्षारोपन केले जाते, लावलेले झाड वाढवण्यासाठी पाणी घालण्यापासून सर्वच काळजी घ्यावी लागते. लावलेले झाड मोठे करण्यासाठी अनेक वर्षे लागतात, तरी विद्यापीठ सातत्याने स्वदेशी प्रजातीची झाडे लावून विद्यापीठ फुलवण्याचा प्रयत्न करते. हीच लावलेली झाडे आगीत जळून खाक झाली तर विद्यापीठाच्या वृक्षारोपणाला काहीच अर्थ उरणार नाही.
सुट्टीच्या दिवशीच आग
विद्यापीठ परिसर 856 एकरचा असल्याने प्रत्येक ठिकाणी सुरक्षा रक्षक ठेवणे शक्य होत नाही. याचाच फायदा घेत गेल्या आठवड्यात रविवारची सुट्टी पाहूनच गवताला आग लावल्याचा प्रकार घडला आहे. अशा प्रवृत्तींना काय म्हणायचे. विद्यार्थ्यांच्या पैशाचा अनावश्यक खर्च करून सर्वत्र सीसीटीव्ही लावणेही विद्यापीठ प्रशासनाला शक्य नाही. तरीही सीसीटीव्ही लावल्यास सीसीटीव्हीत आरोपी कैद होईल, पण संबंधीतावर पोलीस कारवाई केली तर जनतेचे विद्यापीठ म्हणणाऱ्या सर्वच कृती समित्या जाग्या होतील आणि विद्यापीठालाच दोशी मानतात.
विद्यापीठात बरमुड्यावर फिरू नये नियमाचे उल्लंघन
विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या मुली आणि फिरायला येणाऱ्या महिलांची संख्या जास्त असल्याने फिरायला येणाऱ्यांनी विद्यापीठात बरमुड्यावर फिरू नये असा नियम विद्यापीठाने जाहीर केला आहे. परंतू स्वत:ला उच्चभ्रू समजणारे काही लोक सुरक्षा रक्षकाबरोबर हुज्जत घालत विद्यापीठात बरमुड्यावर फिरत असतात. हे विद्यापीठाच्या नियमांचे उल्लंघनच आहे. काहीजण व्यायाम करून घाम आल्याने बनियन काढत अर्धनग्न अवस्थेत फिरत असतात. अशांवर कारवाई करायची की नाही? हे कृती समित्यांनी स्पष्ट करावे, अशी चर्चा शिक्षण क्षेत्रात आहे.
लोकांनी विद्यापीठाला आपल समजावे
विद्यापीठ परिसर हरित ठेवण्यासाठी विद्यापीठ वारंवार प्रयत्न करते. परंतू फिरायला आलेल्या लोकांकडून गवताला आग लावण्याचे प्रकार आठवड्यात दोनवेळा घडले आहेत. या आगीत विद्यापीठातील जैवविविधतेला नुकसान पोहचले आहे. त्यामुळे फिरायला येणाऱ्या लोकांनी विद्यापीठ आपले माणून कोणतेही गैरकृत्य करू नये, अन्यथा नाविलाजास्तव कारवाई करावी लागेल.
डॉ. व्ही. एन. शिंदे (प्रभारी कुलसचिव, शिवाजी विद्यापीठ)