वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पंतप्रधान मोदी यांनी शुक्रवारी गुजरात राज्यात सुरत येथे अर्सेलर मित्तल, निपॉन स्टील या कंपनीच्या पोलाद प्रकल्पाचे भूमीपूजन केले आहे. येत्या काही वर्षात देशातील कच्च्या पोलादाचे उत्पादन 30 कोटी टनांहून अधिक करण्याची सरकारची योजना असल्याची घोषणा याप्रसंगी त्यांनी केली. अर्सेलर मित्तल या कंपनीचा एक प्रकल्प गुजरातमध्ये यापूर्वीच कार्यरत असून त्याच्या हजीरा येथील सयंत्राचा विस्तार शुक्रवारच्या भूमीपूजनाने करण्यात आला.
हा प्रकल्प येत्या 2 वर्षात पूर्ण केला जाणार असून त्यातून दरवर्षी 1 कोटी टनांपेक्षा अधिक कच्च्या पोलादाचे उत्पादन केले जाणार आहे. प्रकल्पासाठी 20 हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. केंद्र सरकार भविष्य काळात खासगी कंपन्यांशी भागिदारी करु नवे पोलाद प्रकल्प निर्माण करेल. विकसित राष्ट्र बनण्यासाठी अधिकाधिक प्रमाणात पोलाद निर्मिती करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान मोदी यांनी याप्रसंगी भाषण करताना केले. आत्मनिर्भर भारताच्या निर्मितीसाठी पोलादाचे उत्पादन आवश्यक आहे. काही दशकांपूर्वी भारताला पोलाद आयात करावे लागत होते. आता मात्र आयएनएस विक्रांत सारख्या महाकाय युद्धनौकेची निर्मितीही भारतात होऊ शकते. आता पोलादाची टंचाई राहिलेली नाही, असे प्रतिपादन पंतप्रधान मोदींनी केले.