अध्याय पंचविसावा
भगवंत उद्धवाला गुणानुसार उत्पन्न होणाऱया दैवी, असुरी व राक्षसी संपत्तीबद्दल माहिती देत आहेत. ते म्हणाले, उद्धवा! सत्त्वगुण वाढल्यावर देवतांचे, रजोगुण वाढल्यावर असुरांचे आणि तमोगुण वाढल्यावर राक्षसांचे बळ वाढते. त्यानुसार स्वभावामध्ये अनुक्रमे सत्वगुण वाढल्यावर देवत्व, रजोगुणामुळे असुरत्व आणि तमोगुणामुळे राक्षसत्व वाढीस लागते. या वाढीमुळे निवृत्ती, प्रवृत्ती किंवा मोह यांचे प्राबल्य दिसून येते. दैवी, आसुरी आणि राक्षसी स्थिती हीच तीन प्रकारच्या गुणांची संपत्ती आहे. जी वृत्ती ब्रह्मांडात असते. तीच स्थिती पिंडात म्हणजे देहातही असते. ब्रह्मांडामध्ये सर्व देव हे महापुरुषाचे अवयव आहेत. पिंडामध्येही तेच देव परस्परात एकोप्याने वागत असतात. ज्याच्या त्याच्या वागणुकीप्रमाणे त्याच्याकडे गुणांची संपत्ती जमा होते. उदाहरणार्थ, स्वधर्मशास्त्राप्रमाणे उचित अशा निष्कर्माकडेच ज्याची प्रवृत्ती असते, तोच दैवी किंवा सत्वस्थ संपत्तीचा धनी होय. तो वाटय़ाला आलेले काम निरपेक्षतेने करून, ते कर्म तो ईश्वराला अर्पण करतो. राजसी स्वभावाच्या माणसाची स्वधर्माप्रमाणे वागायची तर इच्छा असते पण मनामध्ये अत्यंत कामासक्ती असल्याने जी विलासी इंद्रियप्रवृत्ती असते. ती राजस अशी असुरी संपत्ती होय. राजस आणि असुरी संपत्तीचा जो धनी असतो तो वाटय़ाला आलेले काम तर करत असतो पण त्या कर्मापासून उत्तम फल मिळावे असे त्याला वाटत असते. इच्छित फल मिळाले की, आपण सुखी होऊ अशी त्याची कल्पना असते. त्याच्याहीपेक्षा तामसी असुरी प्रवृत्ती घातक असते.
लोभ आणि मोह ह्यांना वश झाल्यामुळे मनात क्रोध असणे आणि अधर्माकडेच प्रवृत्ती असणे, असा प्रभाव असेल, ती तामसी अशी राक्षसी संपत्ती होय. दैवी आणि असुरी प्रवृत्ती परस्पर विरोधी असल्याने स्वधर्म निभावताना मनुष्याच्या स्वभावात क्षणात कामासक्ती, क्षणात निरिच्छपणा, अशी परस्परविरोधी वैशि÷dय़े प्रकट होत असतात कारण तेथे दैवी व आसुरी वृत्तींचा दांडगा संग्राम माजलेला असतो. जेव्हा चित्तामध्ये स्वार्थापोटी मोह व भ्रम वाढून अधर्मच स्वधर्म वाटू लागतो, तेव्हा ती सगळय़ात दुष्ट अशी राक्षसी वृत्ती समजावी. ही राक्षसी वृत्ती दैवी व असुरी ह्या वृत्तींचा नाश करते. माणसाला अध्यात्मातील तत्वात रस असतो, त्याप्रमाणे वागायची इच्छाही असते परंतु बुद्धी त्याला तसे वागू देत नाही कारण स्वार्थ सगळय़ांना पुरून उरतो. त्यामुळे सकाम-निष्कामांच्या मोहभ्रमांशी मनुष्य संयुक्त होतो. त्यावेळी देव, असुर आणि राक्षस ह्यांच्यामध्ये रात्रंदिवस भयंकर झगडा माजतो. त्याचा परिणाम म्हणून क्षणभर परमार्थात गोडी, क्षणभर द्रव्यलोभात गोडी, क्षणभर अनर्थपात करण्यात गोडी, क्षणात परद्रव्य व परदारा ह्यातच गोडी या सगळय़ा गोंधळात माणूस केव्हा कसा वागेल काही सांगता येत नाही. कोणत्याही प्रसंगात त्याच्या वागण्याच्या अनेक छटा दिसून येतात परंतु या सगळय़ामुळे परस्परविरोधी वातावरण तयार होते. त्यामुळे त्याला अत्यंत आवडत असलेली शांती कधीच प्राप्त होत नाही. मग परमार्थाची प्राप्ती कशी होणार? साधक लोक नेहमी विचारत असतात की, चित्तवृत्तीमध्ये कोणती पीडा असते? त्याच पीडेची स्थिती तुला स्पष्ट करून सांगतो. एकच गुण जर पूर्णपणे जडून राहिला, तर एकाच प्रकारची वृत्ती वाढावी, पण तसे मुळीच घडत नाही.
गुण हे इतर गुणांचा उपमर्द करण्यासाठी झगडत असतात. एकच गुणावस्था प्राप्त होत नाही म्हणून एकविधता होत नाही. त्याचा परिणाम म्हणून अनिवार भवपीडा गुणक्षोभाने बाधत असते. तमोगुण अधर्माकडे वाढत असतो, रजोगुण देहकर्माकडे लागतो आणि सत्त्वगुणाची वाढच होत नाही. मग जीवाची मुक्तता व्हावी कशी? रज आणि तम ह्या दोहोंच्या कचाटय़ात सत्त्व हे अडकलेले असते. ते खरोखर वाढूच शकत नाही. परमार्थ साधण्यासाठी तर स्वभाव सात्विक होणे अत्यंत आवश्यक आहे.
सत्त्वगुणाची वाढ फक्त आशा समूळ खणून टाकल्याने होते. तीन गुणांची त्रिपुटी आपणच आपल्या अंतःकरणांत कल्पनेने उभी केलेली असते आणि अखेर तीच संसारभयाच्या रूपाने उठून बाधेच्या रूपाने पाठीस लागते.