पुढच्या दोन दिवसात धरणं भरतील असा अंदाज असून राधानगरी धरण भरलं आणि पाऊस थांबला नाही तर पंचगंगा नदीची पाणी पातळी वाढू शकते. त्यामुळे नागरिकांनी स्थलांतर होण्यास सुरुवात केली पाहिजे आणि त्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावं असे मत कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दिपक केसरकर यांनी म्हटले आहे. ते आज कोल्हापूर जिल्ह्यातील पुरपरिस्थितीची पाहणी करत असताना माध्यमांशी बोलत होते.
पुढे बोलताना ते म्हणाले, “आलमट्टी धरणातील विसर्गासंदर्भात कर्नाटक प्रशासनाशी राज्य सरकारचा समन्वय सुरू आहे. तूर्तास कोयनेतून विसर्ग करता येणार नाही. राधानगरी मधून येणाऱ्या पाण्याला आपल्याला तोंड द्यावंच लागेल. ज्या ठिकाणी भूस्खलन होण्याचा धोका आहे तिकडे प्रशासन लक्ष ठेवून आहे. तिथल्या नागरिकांना जिल्हा प्रशासनाच्या वतीने सतर्क केलं आहे.” असे ते म्हणाले.
पुढे बोलताना ते म्हणाले, “स्थलांतरित होणाऱ्या नागरिकांची सर्व व्यवस्था प्रशासनाने केली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दररोज कोल्हापूरवर लक्ष ठेवून आहेत. राज्य सरकार संपूर्णपणे कोल्हापूरच्या बरोबर आहे. तसेच दुष्काळग्रस्त भागांमध्ये अतिरिक्त पाणी वळवण्याचा देवेंद्र फडणवीस यांचा मानस असून त्या पद्धतीने त्यांनी प्रयत्न करण्यास सुरुवात केली आहे”
शेवटी त्यांनी, “कोल्हापूरला लवकरच आयुक्त दिला जाईल. राज्यातील प्रत्येक आमदाराला त्यांच्या मनाप्रमाणे निधी मिळेल असं नाही. पण आम्ही सर्वांना समान निधी मिळेल याची काळजी सरकारने घेतली आहे.” असेही ते म्हणाले. पालकमंत्र्याबरोबर पुरपरिस्थितीचा दौरा करताना माजी आमदार चंद्रदिप नरके, जिल्हाधिकारी राहूल रेखावार उपस्थित होते.